शिक्षणाची गोडी लावून जीवन समृद्ध करणारी पोथरेची जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

जोपर्यंत मनाला आशेचे पंख, ध्येयाचे वादळ, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे पंख आहेत, समोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे”…..
अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या पंखांना बळकटी देणारे शब्द जर प्राथमिक शिक्षणाच्या वयातच विद्यार्थ्यांच्या कानी पडत असतील तर असे संस्काररूपी शब्द त्यांना नक्कीच आयुष्यभर पुरणारे ठरतील ..कारण संस्कार बाजारात मिळत नाहीत, ते विद्यार्थ्यांवर करावे लागतात… आणि यासाठीच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय बप्पासाहेब शिंदे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांच्या अभिनव आणि कल्पक उपक्रमाद्वारे शाळेत महिन्यातून एकदा विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे प्रेरक व उद्बोधनात्मक व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते. आतापर्यंत त्याची सात पुष्पं गुंफुन झाली आहेत… याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांवर मूल्यसंस्कार करणे हाच ! कारण मूल्यशिक्षण आणि संस्कार ही शिक्षण रथाची दोन चाके आहेत… शिवाय या निमित्ताने आमच्या शाळेतील शिक्षणाच्या पालखीलाही दमदार खांदेकरी मिळताहेत हे विशेष!
याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पोथरे यांच्या समन्वयातून कालच्या प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेला एक अभिनंदनीय उपक्रम म्हणजे, सध्या ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हे अभियान जोरात चालू आहे.. त्यानुसार आमच्या शाळेतील दोन विद्यार्थीनी ज्यांनी जि.प. टॅलेंट हंट स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळवले आहे त्या गुणवंत विद्यार्थीनींच्या हस्ते शाळा व ग्रामपंचायत यांचे ध्वजारोहण करून ‘ हमारी बेटी- हमारे गाँवका अभिमान’, बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अशा घोषणा देऊन गावात एक आदर्श निर्माण केला व “बेटी बचाओ’ अभियानाला खऱ्या अर्थाने साथ दिली… त्याचबरोबर इ..७ वी मधे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात येईल अशी घोषणाही अध्यक्षांनी स्वातंत्र्यदिनी केली होती… त्याची अपेक्षित फलश्रुती देखील आम्हास १५ ऑगस्टपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे… विद्यार्थी आळस झटकून अभ्यासाला लागले आहेत … हे ही नसे थोडके!
सध्या ध्वजारोहण करणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून प्रतिष्ठेसाठी जो तो पदाधिकारी धडपडत असताना मा .अध्यक्ष व मा. सरपंच यांचा हा उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आणि वाखाणण्याजोगा आहे.
जि . प. च्या टॅलेंट हंट स्पर्धेमुळे आमचे स्पर्धक विद्यार्थी ‘यशाने हुरळायचे नाही आणि अपयशाने खचून जायचे नाही ” हा कानमंत्र ही जपण्यास शिकले, हा ही एक अपेक्षित वर्तनबदल! ‘ ‘आदराने सांधलेलं आणि प्रेमाने बांधलेलं नातं म्हणजे गुरुशिष्य नातं.. कारण मूळात विद्यार्थी असतातच सूर्यफुलासारखे.. प्रेम विश्वास जिथे मिळेल तिकडेच झुकणारे …त्यांच्या मनाचं वलय ही शिक्षकांभोवतीच… याचा अनुभव कालच्या सप्टेंबर महिन्यात मला आला, माझ्यावर मेंदूविषयक खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती… मी वैदयकीय रजेवरून शाळेत हजर होताच माझ्या विद्यार्थ्यांनी वर्गात फुलांच्या पायघड्या टाकून माझे दिमाखात स्वागत केले… टाळ्यांचा कडकडाट आणि त्यांनी केलेल्या फलकलेखनाद्वारे त्यांच्या भावना काळजापर्यंत पोहचत होत्या…. त्यांच्या आनंदाला अक्षरक्षः उधाण आले होते… एक विद्यार्थी ,ज्याने त्याचे आईवडिल गमावले आहेत … तो माझ्या रजेच्या कालावधीत दररोज मला फोन करून वेळेवर जेवण आणि औषधगोळ्या घेतल्या का याची दक्षता घेत असे.. ही आमचे CEO मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या दशसूत्री उपक्रमाची एक परिणामकारक फलश्रुती..
परवाच शाळेत पाण्याचा फिल्टर बसविण्यासाठी शा.व्य.समितीच्या माध्यमातून लोकवर्गणी करण्याचे ठरले तेव्हां त्यामधे खारीचा वाटा म्हणून माझ्या इ. ७ वी च्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या खाऊच्या पैशातून 50/100 अशी RO बसवण्यासाठी वर्गणी देऊन त्यांची शाळेविषयीची तळमळ, प्रेम हे संस्कार आम्हांस दाखवून दिले…
‘भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर मनांचा देश हे फक्त उद्याचे नागरिकच घडवू शकतात’ या डॉ. कलाम साहेबांच्या वाक्यानुसार गेल्याच महिन्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळत असताना 2500 रु. सापडले. ते पैसे त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करून शाळेत आदर्श विद्यार्थी घडत असल्याचा जणू पुरावाच दिला….
याचबरोबर आमचे BDO मा. मनोज राऊत साहेब यांच्या Science Wall या उपक्रमामुळे आमचे विद्यार्थी अंधश्रद्धा न ठेवता परिसरात घडणारी प्रत्येक घटना विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहू लागले , पालकांचे उद्बोधन करू लागले आणि म्हणूनच शिक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी यावर्षीची दिवाळी फटाक्याविना म्हणजेच प्रदूषणमुक्त साजरी केली आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लावला कारण,
पृथ्वी अमुची सखीसोबती..
अनंत उपकार तिचे अमुच्या वरती…
हे विद्यार्थ्यांनी आता जाणून घेतलेय… या सर्व उपक्रमांसाठी आमचे मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांची साथ तर असतेच याशिवाय माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, आ. जयवंत नलवडे साहेब व खारगे सर यांचे अनमोल मार्गदर्शनही आम्हाला नेहमीच मिळत असते.
हे सर्व थोडे की काय, म्हणून आमच्या शा.व्य समितीचे अध्यक्ष व सदस्य स्वतःचा अमूल्य वेळ खर्ची घालून अधूनमधून वर्गभेटी करून विद्यार्थ्यांमधे अगदी समरस होऊन आनंददायी शिक्षणाद्वारे अध्यापन करून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा देखील घेतात आणि आवश्यकतेनुसार पालकांचेही उद्‌बोधन करतात… सर्व शिक्षकांना गावातील सन्माननीय पालकवर्गाचे आणि ग्रामस्थांचे अपेक्षित सहकार्य आणि यथोचित शाबासकीची थापही मिळत असल्याने शिक्षकांनाही आणखी ऊर्जा मिळत आहे.
तन, मन, धनाने शाळेसाठी सर्वोतोपरी झटणाऱ्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या आमच्या शा. व्य. समितीचे आणि पालकांचे कौतुक करावे तितके थोडेच…
एकंदरीत, या उपक्रमांची व्याप्ती जसजशी वाढेल तसतसे याद्वारे शिक्षणाची यशोगाथा गाण्याइतपत आमचे विद्यार्थी नक्कीच आदर्शवत होतील असा विश्वास वाटतो ……

सौ. शगुफ्ता शेख (हुंडेकरी) विषयशिक्षिका
जि. प. प्रा. केंद्रशाळा पोथरे ता. करमाळा जि. सोलापूर

..

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

5 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

8 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago