जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विकासासाठी ग्रामविकास खात्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही अनेक ठिकाणी सक्षम व निर्णयक्षम नेतृत्वाअभावी विकासकामे रखडली आहेत. केवळ घोषणा करणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची ताकद आणि अनुभव महायुतीकडेच आहे, असा ठाम विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असून ते महायुतीकडेच आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत महायुतीच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.
करमाळा तालुक्यात आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत पालकमंत्री गोरे बोलत होते. या कार्यक्रमास माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. रश्मी बागल, वीट जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. अश्विनी गणेश चिवटे, वीट पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ. पूजा सचिन ढेरे तसेच हिसरे पंचायत समिती गटाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, “ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटारे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, घरकुल योजना तसेच महिला बचत गटांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विकासकामांना वेग दिला जाणार असून निधीअभावी एकही काम रखडू दिले जाणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, तीस–चोपन्न रस्ते, पंचवीस–पंधरा रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. “मांगी तलावाचे पाणी दुसऱ्या भागात वळवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन ठोस निर्णय घेत असल्याचे गोरे यांनी सांगितले. विरोधकांकडे केवळ टीकेचे राजकारण असून निधी आणण्याची क्षमता आणि काम करण्याची इच्छाशक्ती महायुतीकडेच आहे. विरोधी उमेदवार निवडून आल्यास निधीसाठी कोणाकडे जायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि मतदारांना विचार करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर सर्वांगीण, लोकाभिमुख व शाश्वत विकासासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देणे हाच एकमेव व्यवहार्य पर्याय असल्याचे सांगत, मतदारांनी विकासाच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
कार्यक्रमास भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे, युवा नेते दिग्विजय बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवकर, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मायाताई झोळ,संचालक अमोल यादव, कन्हैयालाल देवी, चंद्रहास निमगीरे, उपनगराध्यक्ष अतुल फंड, भास्कर भांगे, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, सरपंच महेश गणगे, नगरसेवक दिपक चव्हाण, संजय गुटाळ दत्ता सरडे भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, अफसर जाधव, देवा ढेरे, देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड, संजय आण्णा घोरपडे, मकाईचे संचालक सतिश नीळ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा सौ. नलिनी लुंगारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन ॲड. भगवान गिरी यांनी केले तर आभार युवा नेते दिग्विजय बागल यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…