Categories: करमाळा

करमाळा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू तात्काळ द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू — नागेश कांबळे

करमाळा, प्रतिनिधी :
करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देऊन तात्काळ रॉयल्टी पास देण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआय (आठवले गट)चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार उपस्थित होते.
करमाळा शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे ९० घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. या घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची आवश्यकता भासत आहे. विशेषतः वाळूच्या वाढत्या दरामुळे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करणे व पूर्ण करणे कठीण झाले असल्याचे नागेश कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही गरीब व वंचित घटकांना सुरक्षित व सन्मानजनक निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. मात्र वाढत्या बांधकाम साहित्याच्या किमतीमुळे अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण करणे कठीण जात आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार किंवा स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना प्रत्येकी किमान ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागेश कांबळे यांनी केली आहे.
रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना या विविध घरकुल योजनांमध्ये लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत वाळू देण्याची तरतूद शासनाने केलेली आहे. या अनुषंगाने स्थानिक पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे संबंधित लाभार्थ्यांची यादी तपासून वाळूचे रॉयल्टी पास देऊ शकतात. त्यामुळे करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर सर्व ९० लाभार्थ्यांना तात्काळ वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, गरीब लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि त्यांचे घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आरपीआय (आठवले गट)च्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागेश कांबळे यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

7 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

10 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago