करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेतील फार्मसी महाविद्यालयातील डी. फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जल्लोषात आणि भावनांच्या सुरेल संगमात पार पडला. “आठवणींची शिदोरी आणि नव्या स्वप्नांची भरारी” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्योती जावळे, डॉ. के. श्रीकांतकुमार, अमित पोंदकुले व प्रीती कोळपे यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी विद्यार्थ्यांना मारदर्शन करताना “आजचा निरोप म्हणजे शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धमाकेदार नृत्य, हृदयस्पर्शी गाणी आणि हास्यविनोदांनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत दिली. विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमधील गमतीशीर आठवणी आणि अविस्मरणीय क्षण शेअर करत उपस्थितांना भावूक केले.कार्यक्रमादरम्यान “बेस्ट स्टुडंट, मिस्टर आणि मिस फेअरवेल” यांसारखे पुरस्कारही देण्यात आले. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन सेल्फी आणि ग्रुप फोटो घेत, मैत्रीच्या आठवणींना कायमस्वरूपी जतन केले. आनंद, हशा आणि थोड्याशा अश्रृंनी सजलेला हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अध्याय ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी बनसोडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. प्रियांका लोकरे यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी प्रा. श्रेयश बंडगर, दीपाली साळुंके, प्रियांका खाडे, हर्षदा भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रा. ताई येळे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे कार्यक्रमाची संपन्न झाला.