Categories: Uncategorized

दहिगाव उपसा सिंचनचे पाणी नेरले-सालसे तलावात सोडा पाणीटंचाईचे संकट गडद; औदुंबरराजे भोसले पाटील यांची मागणी कुकडी विभागाला लेखी निवेदन

करमाळा, प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील नेरले, सालसे, केम परिसरात पावसाळा सुरू असूनही अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ओढे, तलाव आणि बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने नागरिकांसह पशुधनालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने नेरले-सालसे तलाव तसेच परिसरातील बंधाऱ्यांमध्ये सोडावे, अशी मागणी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग, करमाळा कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर केले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची विनंती केली आहे.
भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी-करमाळा मार्गालगत साडे ओढ्यावर नेरले-सालसे तलाव असून, घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर नेरले येथे दुसरा तलाव आहे. या दोन्ही ओढ्यांवर अनेक लहान-मोठे बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
परिसरात जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पशुधनासाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे.
भोसले यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत दहिगाव योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात पाणी सोडल्यास या भागातील गंभीर समस्या दूर होऊ शकते. साडे येथून पाणी सोडल्यास नेरले-सालसे तलाव भरू शकतो, तर निंभोरे-घोटी मार्गे पाणी सोडल्यास दुसरा तलाव आणि त्यावरील सर्व बंधारेही भरू शकतात.
या तलावांमधील पाण्यावर वरकुटे, अळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी, लोणी (ता. माढा) यासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचे सिंचन आणि पशुधनाची पाण्याची गरज अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“उजनी धरणाचे पाणी शेकडो किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते, मग या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ते का सोडले जाऊ शकत नाही?” असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून नेरले-सालसे परिसरातील तलाव, बंधारे आणि विहिरींना जीवदान मिळेल तसेच नागरिक, शेतकरी आणि पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी मागणी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर युवा नेते शंभूराजे जगताप यांचा खंबीर पाठिंबा; आज १ दिवसाचे लक्षवेधी उपोषण

​ ​करमाळा प्रतिनिधी: उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना नियमित ८ तास हक्काची वीज मिळावी, या अत्यंत रास्त…

18 hours ago

युवा नेतृत्व ॲड.अजित विघ्ने संघर्षाची कहाणी २६ जुलै वाढदिवस विशेष लेख-नरेंद्रसिंह ठाकुर जिल्हा सरचिटणीस भाजप किसान मोर्चा

राजकारणात सर्वसामान्य घरातील एखाद्या माणसाने मोठी स्वप्न पहाणे म्हणजे सोप्पी गोष्ट नसते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या…

2 days ago

ग्रामपंचायत प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम स्थगित; सुजित बागल यांच्या मागणीला यश राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

करमाळा प्रतिनिधी राज्यातील १५,१५५ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारा प्रारूप मतदार…

3 days ago

करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरात वीजपुरवठा ८ तास करा; कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तात्काळ सुरू करा – माजी आमदार संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा…

3 days ago

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पांडुरंगाच्या नामघोषात बाल दिंडी साजरी

करमाळा प्रतिनिधी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे बाल दिंडी उत्साही वातावरणात साजरी झाली. संस्थेचे अध्यक्ष…

3 days ago