Categories: Uncategorized

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

करमाळा प्रतिनिधी:
गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे. कुठे दुष्काळसदृश स्थिती, कुठे महापूर, तर कुठे नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीचे झालेले नुकसान यामुळे बळीराजा आधीच संकटात आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसून बाजारात व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, खते आणि बियाणांचे वाढलेले दर यामुळे शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. या चक्रव्यूहामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असतानाच, महावितरणकडून करमाळा तालुक्यातील शेतीपंपांची वीज कपात करून ती अवघ्या दोन ते चार तासांवर आणणे म्हणजे बळीराजाला थेट आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे आहे, असा घणाघाती आरोप शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी केला आहे.
​उशाला पाणी, तरीही पिकांना विजेअभावी कोरड
​पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना करमाळा तालुक्याला उजनी धरणाच्या पाण्याचा मोठा आधार आहे. तालुक्याभोवती तीन प्रमुख धरणे असून उजनी धरण १०० टक्के भरलेले आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही विजेअभावी शेतीला पाणी देता येत नाही आणि डोळ्यांदेखत पिके जळून जाण्याची वेळ आली आहे, हे अत्यंत खेदजनक आहे.
​काही दिवसांपूर्वीच चिकलठाण येथील शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण करून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी मान्य करून घेतली होती. मात्र, प्रशासनाने पुन्हा सर्व शेतीपंपांची वीज कपात करून चार तासांवर आणली आहे, तर काही भागांत केवळ दोनच तास वीज दिली जात आहे. मुबलक पाणी उपलब्ध असताना केवळ वीज वितरणातील त्रुटींमुळे शेतकरी देशोधडीला लागत असून, याला तालुक्यातील उदासीन आणि मतलबी राजकीय पुढारी जबाबदार आहेत, असे जगताप यांनी नमूद केले.
​शेतीसह ग्रामीण जनजीवन विस्कळीत
​हा वीजप्रश्न आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठाही पूर्णपणे खंडित केला जातो.                                       यामुळेरात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
​वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांचे हाल होत असून ग्रामीण भागात डासांचा उपद्रव व उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
​पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प पडत असल्याने सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
​गट-तट बाजूला ठेवून मंत्रालय स्तरावर तोडग्याची गरज
​या गंभीर समस्येवर स्थानिक पातळीवर केवळ तात्पुरती आंदोलने किंवा उपोषणे करून कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही, असे स्पष्ट करत शंभूराजे जगताप यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे:
​करमाळा तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांनी आपापले गट-तट बाजूला ठेवून एकमुखाने हा प्रश्न मांडला पाहिजे.
​जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करावी.
​शेतीसाठी दिवसा सलग किमान आठ ते दहा तास थ्री-फेज वीज आणि गावांमध्ये अखंडित सिंगल फेज वीजपुरवठा देण्याबाबत शासन स्तरावरून तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा.
​शासनाने आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर करमाळा तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन तीव्र जनआक्रोश उभारला जाईल, असा इशारा शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

22 hours ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago

करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांसाठी 2 कोटीं 50 लाख निधी मंजूर पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल यांची माहिती

  करमाळा प्रतिनिधी | बळीराजाला शेतात जाणे सोयीचे व्हावे तसेच शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व…

2 days ago