करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना या माध्यमातून नेतृत्वाची संधी उपलब्ध झाली आहे.करमाळा तालुक्याचे केत्तुर पंचायत समिती गणाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड.अजित विघ्ने यांनी तालुक्यात प्रथम क्रमांकाची मते मिळवून इतिहास रचला आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सुरुवातीलाच या अभ्यासु नेतृत्वाला तालुक्याचे उपसभापती होण्याची संधी दिली. बिनविरोध उपसभापती झालेनंतर त्यांनी पंचायत समिती कार्यालयात दक्ष राहून जनतेची कामे सहजतेने मार्गी लागण्याची दक्षता घेतली असुन,स्वतः अनेक संकल्पना राबवीत ‘”आपलं गाव-आपला विकास”‘ ही संकल्पना घेत गाव भेट दौरा राबवित आहेत. आजर्यंत त्यांनी केत्तुर पंचायत समिती गणातील गोयेगाव,पोमलवाडी, हिंगणी,कोंढार- चिंचोली,खातगाव, कात्रज,रामवाडी, जिंती या गावांचा दौरा पूर्ण केला असुन, प्रत्येक दिवशी एक गाव भेट याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी नऊ वाजता सर्व स्थानिक अधिकाऱ्यांसह ते पोहोचत आहेत. या बाबत त्यांचेकडुन आम्ही विस्तृत माहिती घेतली असता त्यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, सकाळी नऊ वाजलेपासून दौऱ्याला सुरुवात होते.प्रथमतः ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसुल अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेवक,पशुवैद्यकीय अधिकारी,गावातील बचत गट प्रमुख, सरपंच,उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील यांचेसह ग्रामस्थांचे उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात होते. या प्रसंगी ग्रामपंचायतीकडील सर्व इंतभुत माहिती घेऊन चर्चात्मक पद्धतीने पाणी पुरवठा, वीज,रस्ते, आरोग्य,शिक्षण, घरकुल योजना व इतर अन्य सर्व योजनांची माहिती घेऊन, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, रेशनकार्ड, आयुष्यमान कार्ड याची माहिती घेत महिला,दिव्यांग व ग्रामस्थांचे तक्रारी ऐकुन घेत त्यावर लागलीच उपाययोजना केल्या जातात व शासनाचे विविध योजनांची माहिती देऊन अर्जांचे वाटप केले जाते. ग्रामपंचायतीचे अंतर्गत असणाऱ्या पाणी पुरवठा, स्मशानभुमी, रस्ते, राबवित असलेले उपक्रम व शासकीय इमारतींचे प्रत्यक्ष पहाणी व त्याचे फोटो घेत संपुर्ण माहिती एकत्रित घेतली जाते. या दौऱ्याचे वेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देऊन तेथील अडीअडचणी समजावुन घेत विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी हितगुज साधन गुणवत्तेची तपासणी,शालेय पोषण आहाराची तपासणी, शौचायलाची व्यवस्था, अंगणवाड्यांची भेट घेत तेथील सर्व सोई सुविधांची पहाणी केली जाते. नागरिकांचे सार्वजनिक प्रश्न आणि वैयक्तिक प्रश्न समजुन घेत त्या प्रश्नांची दखल घेतली जाते व तात्काळ संबंधित अधिकारी यांना फोन करून प्रत्येक प्रश्न विचारून त्याचे तात्काळ निराकरण केले जाते. लोकसहभागातुन गावच्या विकासाला गती देणे बाबतचे मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमामुळे व गाव भेट दौरा राबविल्यामुळे आजपर्यंत जवळपास 38 सार्वजनिक प्रश्न मार्गी लागले असुन जवळपास 240 वैयक्तिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र फाईल केली असुन प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतंत्रपणे इंतभुत माहिती घेतली आहे. ग्रामपंचायतीचे आराखडे कसे तयार करायचे याबाबतही मार्गदर्शन केले असुन, प्राथमिकता कोणत्या कामाला दिली पाहिजे याबाबत सरपंच व सदस्यांची जागृती केली आहे. अशाप्रकारचा गाव भेट दौरा करून जनजागृतीसह मार्गदर्शन आणि प्रशासन वेगवान करण्यासाठी प्रोत्साहन देणेचे काम तसेच सर्वसामान्य माणसाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम या दौऱ्याचे माध्यमांतून करण्यात येत असुन, उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांचे ग्रामस्थांमधुन कौतुक होताना दिसत आहे.