मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शेलगाव (वांगी) येथे भव्य रक्तदान शिबिर सेवा यज्ञ–महा रक्तदान संकल्प’ उपक्रमातून समाजसेवेचा संदेश*भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते होणार उद्घघाटन
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा यज्ञ–महा रक्तदान संकल्प’ या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण मंडळाच्या वतीने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी शेलगाव (वांगी) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात येणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी आणि समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन सकाळी दहा वाजता भाजप युवा नेते तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण मंडळाचे तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ यांनी दिली. या उपक्रमात मोठ्या संख्येने युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होऊन रक्तदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, रक्तसंकलनासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या उपक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले असून, युवा नेते विवेकजी शेंडे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पणाची भावना जपत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे रक्तदान हा केवळ सामाजिक उपक्रम नसून मानवतेच्या सेवेला वाहिलेला सर्वोच्च उपक्रम असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक परिश्रम घेत असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सेवायज्ञाला यशस्वी करावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ यांनी केले आहे.


