आमदार पाटलांनी दहिगावच्या उन्हाळी आवर्तनाचा हिशोब द्यावाक्ष अर्जुननगरचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब आमदार पाटील यांनी द्यावा आणि त्यानंतरच त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असा घणाघाती हल्ला अर्जुननगर गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी केला आहे .
याविषयी अधिक माहिती बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून अर्जुननगर गावाला पाणी मिळालेले नाही. आमच्या गावाला दहीगावच्या उजवी चारी क्र.१ वरून शेलगाव मार्गे पाणी येते. गेल्या वर्षी शेलगाव हद्दीतील बंधारे भरून अर्जुन नगर हद्दीमध्ये प्रवेश केला की पाणी बंद झालेले होते किमान गेल्यावर्षी आमच्या गावाच्या हद्दीत पाण्याने प्रवेश तरी केलेला होता, परंतु यावर्षी मात्र वारंवार दहीगाव कार्यालयाकडे पाण्याची मागणी केलेली असूनही अद्यापही पाणी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. यापूर्वीच्या खरीप, रब्बी हंगामाचे पाणी मिळालेले नाही उन्हाळी आवर्तनाचे पाणी मिळणे तर खूप मोठे कठीण दिसत आहे.असे असताना पाटील गटाचे प्रवक्ते मात्र हवेत वार करत ९० दिवस योजना चालली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत हा प्रकार त्यांनी थांबवावा आणि उन्हाळ्यातील पाणी आवर्तनाचा हिशोब त्यांनी द्यावा असा हल्लाबोल श्री थोरात यांनी केला.
“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती झालेली असून आमदार पाटील गटाचे प्रवक्ते मात्र प्रत्येक वर्षी त्या वर्षातील सर्वोत्तम विनोद करण्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी दहिगावच्या इतिहासात सर्वप्रथम सर्व दहाच्या दहा पंप सुरू… शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अशी भंपकबाजी केलेली होती. प्रत्यक्षात योजना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद पडली. अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिली. हा इतिहास ताजा असतानाच चालू वर्षीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.
९० दिवसांपासून दहिगाव योजनेचे आवर्तन सुरू असा इतिहास सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न पाटील गटाचे प्रवक्ते करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की,जानेवारीला योजना ज्यावेळेस सुरू झालेली होती त्यावेळेस अनेक गावांचे तलाव, ओडे, नाले यामध्ये पाणी होते. शेतकऱ्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नव्हती. उजनी धरण ही शंभर टक्के भरलेले होते. असे असताना त्या गावाच्या पाण्यात पाणी सोडून त्या गावाला पाणी दिले अशी दप्तरी नोंद केली गेली. परिणामी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या आवर्तनामध्ये ही गावी वंचित राहत आहेत.


