२५ वर्षांनंतर रेशन कार्ड वाटप मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन- औदुंबरराजे भोसले

करमाळा (प्रतिनिधी):
सुमारे पंचवीस वर्षांपासून बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेरले (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लेखी निवेदन दिले आहे.
पूर्वी तहसील कार्यालयामार्फत दर पाच वर्षांनी रेशन कार्ड वाटपाची मोहीम राबवली जात होती. सन 1997 ते 2000 दरम्यान तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार व कोतवाल यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे पार पडत होती. या प्रक्रियेत नवजात बालकांचे, विवाहानंतर आलेल्या महिलांचे नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट केली जात, तर मृत किंवा परगावी स्थलांतरित झालेल्यांची नावे वगळली जात होती. तसेच नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना नवीन रेशन कार्ड दिले जात होते.
या पद्धतीमुळे नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागत नव्हते. केवळ तातडीच्या कामांसाठीच कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिक आणि प्रशासन दोघांचाही वेळ वाचत होता. सन 1997-98 मध्ये दारिद्र्यरेषेचा सर्वेक्षण होऊन पात्र नागरिकांना पिवळे रेशन कार्ड, तर इतरांना केसरी कार्ड 2000 साली वितरित करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर गेल्या २५ वर्षांत अशा प्रकारची मोहीम राबवली गेली नाही. परिणामी, नागरिकांना नाव समाविष्ट करणे, कमी करणे किंवा नवीन कार्ड मिळवण्यासाठी तहसील पुरवठा कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. अर्ज करूनही एक ते दोन वर्षे कामे प्रलंबित राहतात, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, अनेक रेशन कार्डे जीर्ण अवस्थेत असून काही वृद्ध नागरिक आर्थिक अडचणीमुळे करमाळा येथे जाऊन अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकजण धान्य व इतर शासकीय लाभांपासून वंचित राहत आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेता, पूर्वीप्रमाणेच रेशन कार्ड वाटपाची विशेष मोहीम पुन्हा सुरू करावी, जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल, अशी मागणी औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


