विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे निवेदन; रास्ता रोकोचा इशारा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ करमाळा तालुका काँग्रेस (आय)च्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी सांगितले की, नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर करण्यात आलेली कथित लाठीमाराची कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिताताई शिंदे यांच्याशीही धक्काबुक्की करून अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना जगताप म्हणाले की, देशभरातील युवकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप निर्माण झाला असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा.
येत्या दोन दिवसांत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास करमाळा तालुका काँग्रेस (आय)च्या वतीने तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, अण्णा साळवे, अभिमान लष्कर, प्रतीक जगताप, किरण साळुंखे, बबलू चिंचकर, अशोक घरबुडे, नितीन चोपडे, गफूर शेख, सोमनाथ राखुंडे, योगेश राखुंडे, परवेजभाई पठाण, देवराव सुकळे, गणेश फलफले, सचिन काका कटारिया, मंगेश चिंचकर, अन्वर शेख, मुनीर शेख, असिफ बागवान, शिवाजी आवटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


