Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

डॉ.बाबा आढाव सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती -ॲड राहुल सावंत करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, प्रख्यात समाजसेवक, सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती, सत्यशोधक, कामगार चळवळीचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे पुणे येथील पुना हॉस्पिटल येथे सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८.३० वा उपचारादरम्यान निधन झाले. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने श्रमिकाबरोबरच उपेक्षित, वंचित, आणि दुर्लक्षित घटकांसाठी नेतृत्व करित असणारे व लाखो कामगारांचा आधारवड गेला असल्याचे करमाळा तालुका हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.
करमाळा तालुका हमाल पंचायत तर्फे हमाल भवन येथील डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यावेळी ॲड राहुल सावंत पुढे बोलताना म्हणाले की,
डॉ. बाबा आढाव हे अन्यायाच्या अंधारात उभा राहिलेला एक दिवा होता. एका साध्या घरात जन्मलेला हा माणूस मोठा डॉक्टर होऊ शकला असता, सुखात जगू शकला असता पण त्याच्या कानावर भुकेलेल्या कामगारांचे आक्रोश पडले आणि त्याने आपल्या आयुष्याचा मार्ग बदलला.
पुण्यातील हमाल, तोलार, रस्त्यावरील फेरीवाले, डोक्यावर वजन वाहणारे मजूर, कचरा वेचणारे, रिक्षावाले, टेम्पोवाले असे अनेक कामगारांना आज त्यांना जरा सन्मानाने जगता येते, कारण त्यांच्या मागे डॉ. बाबा आढाव नावाचा खंबीर हात होता.
त्यांनी केवळ संघटना उभी केली नाही, त्यांनी कामगारांना विश्वास दिला. त्यांनी आपणही माणूस आहोत हा विसरलेला भाव कामगारांच्या मनात पुन्हा रुजवला. त्यांचा आवाज मोठा नव्हता, पण मनाची पकड अपार होती. त्यांनी कोणाला हरवण्यासाठी संघर्ष केला नाही, ते हरवलेल्यांना उभे करण्यासाठी लढले.
त्यांनी हमालांना संघटित केले आणि कामगारांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळ ही भीतीने नव्हे – तर तत्त्वाने चालली.
सुरक्षित बाजूने डॉ. बाबा आढाव यांनी कधी सुरक्षित बाजू निवडली नाही. ते नेहमी तिथे गेले – जिथे शासन मौनात होतं, जिथे समाज दुर्लक्ष करत होता, आणि जिथे सामान्य माणसाचा आवाज दडपला जात होता. त्यांच्या लढ्यात आक्रमकता होती, पण स्वार्थ नव्हता. त्यांच्या शब्दात धार होती, पण द्वेष नव्हता. हीच बाब त्यांना संघर्ष नेत्यांमध्ये वेगळे स्थान देते.
जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी उपेक्षित लोकांसाठी ते काम करित राहिले, अशा या समाजसेवकाचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक समाजवादी नेतृत्व पडद्याआड गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा थोर मानवास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
यावेळी भिमराव लोंढे व दिपक उबाळे यांनीही बाबां विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी करमाळा तालुका हमाल पंचायत चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!