दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात… यामध्ये विद्यमान आमदारांचे योगदान काय ? माजी जिल्हा परिषद सदस्य विलासकाका राऊत यांचा हल्लाबोल
करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात झाली असुन महावितरण कडून प्रकल्पाबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले असल्याची बातमी नुकतीच प्रकाशित झाली होती. या बातमीचा खरपूस समाचार माजी जिल्हा परिषद सदस्य व घोटी गावचे लोकनियुक्त सरपंच विलासकाका राऊत यांनी घेतला आहे. ते म्हणाले की शेतकऱ्यांना सौर वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडून वैयक्तिक 90% सवलत दिली जात आहे. एवढेच नाही तर महावितरण कडून चालविली जात असलेली जेवढी ही सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशन वरील एक फिडर हे सौर ऊर्जेवरती चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासनाने गुंतवणूक केलेली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज हे त्या पाठीमागील कारण आहे. यामध्ये खाजगी गुंतवणूकदारांनाही प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सौर ऊर्जेवरती वीज पुरवठा करणे हे शासनाचेच ध्येय आहे. याच उद्देशाने देशभरातील व महाराष्ट्र राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवरती चालवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.म्हैसाळ उपसा सौर प्रकल्प – 1,594 कोटी,राज्यस्तरीय उपसा योजना सोलरायझेशन – 3,366 कोटी असा एकूण 4,960 कोटी निधी महाराष्ट्रात धरणांवरील उपसा / लिफ्ट सिंचन योजनांसाठी केवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ही रक्कम वीज बिल कायमस्वरूपी कमी करण्यासाठी आणि उपसा योजना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे इस्टिमेट करण्याचे काम कदाचित सुरू झाले असेल परंतु यामध्ये आमदारांचे नेमके योगदान काय हे त्यांनी जाहीर करावे. विनाकारण दहीगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये.
2024 मध्ये उजनी धरण 100 टक्के भरले असतानाही एप्रिल 2025 मध्ये उजनी धरणाने तळ गाठल्यामुळे संपूर्ण उन्हाळा हा दुष्काळासारखा दहीगाव पट्ट्यातील लोकांना गेला. या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम म्हणजे दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिकेचे काम बंद पाडून पाईप जाळण्याचा प्रकार विद्यमान आमदार समर्थक कार्यकर्त्यांकडून एक वेळेस नाही तर दोन वेळेस घडलेला आहे. यामुळे दहिगाव पट्ट्यामध्ये विद्यमान आमदारांचे विरोधात प्रचंड आक्रोश आहे.हा संताप कमी व्हावा, लोकांची सहानुभूती मिळावी या उद्देशाने संबंधित दिशाभूल करणारी बातमी आमदार कार्यालयाकडून दिली गेलेली आहे. या बातमीमध्ये उल्लेख केलेले अधिकाऱ्याचे नाव व त्यांचे कार्यालय यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप असे कोणतेही काम आमच्या कार्यालयाकडून सुरू नाही असा खुलासा त्यांनी केलेला आहे. यावरूनच आमदारांचे कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड ही लज्जास्पद आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.


