करमाळ्यात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव सुसज्ज कोंडवाडा, उपचार व चारापाणी व्यवस्थेची तातडीची मागणी शब्द सैनिक सामाजिक प्रबोधन मंचचे करमाळा नगर परिषद प्रशासनाला निवेदन
करमाळा प्रतिनिधी :
करमाळा शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शब्द सैनिक सामाजिक प्रबोधन मंचच्या वतीने करमाळा नगर परिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्ते, चौक व वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी, शेतकऱ्यांचे नुकसान, तसेच सार्वजनिक व खासगी मालमत्तेची हानी होत आहे. अनेक वेळा ही जनावरे जखमी होऊन रस्त्यावरच मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीस प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा ठपका मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे.
निवेदनात विशेषतः आजारी, जखमी व वयोवृद्ध जनावरांच्या दयनीय अवस्थेचा उल्लेख करण्यात आला. उपचाराअभावी ही जनावरे रस्त्यावर तडफडत असल्याने ही स्थिती अमानवी असल्याचे सांगण्यात आले. राज्यात गोवंश संरक्षणाचा कायदा अस्तित्वात असताना करमाळा शहरातील गोवंशाची अवस्था लाजिरवाणी असल्याचेही नमूद करण्यात आले.
मंचचे अध्यक्ष गोपाल वाघमारे यांनी प्रशासनाला थेट सवाल करत, “गोवंश संरक्षण केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे,” असे स्पष्ट केले.
मंचच्या वतीने नगर परिषद हद्दीतील उपलब्ध जागेत सुसज्ज व कायमस्वरूपी कोंडवाडा तातडीने उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, तसेच मोकाट जनावरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधित मालकांना अधिकृत नोटीस देण्यात यावी. नोटीसनंतरही गुरे न बांधणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करून जनावरे कोंडवाड्यात जप्त करावीत, अशी भूमिका मांडण्यात आली.
यासोबतच विशेष मोहीम राबवून एकाचवेळी सर्व मोकाट जनावरे कोंडवाड्यात जमा करावीत, कोंडवाड्याच्या बांधकाम व व्यवस्थापनाची माहिती सार्वजनिक करावी, देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि जनावरांसाठी नियमित चारा, पाणी व वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा ठोस मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या वेळी नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक सचिन भाऊ गायकवाड, नगरसेवक रवी भाऊ जाधव, नगरसेवक सुनील बनसोडे, विकी कारंडे, संतोष कांबळे यांच्यासह मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
“हा प्रश्न केवळ जनावरांचा नसून शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा व गोमातेच्या सेवेचा आहे. प्रशासनाने तातडीने ठोस व परिणामकारक कार्यवाही केली नाही, तर पुढील टप्प्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल,” असा इशारा अध्यक्ष गोपाल वाघमारे यांनी दिला.


