करमाळा शहरातील मेनरोडवरील खड्ड्यांमुळे व्यापाऱ्यांचा संताप; तात्काळ डांबरीकरणाची नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहरातील मेनरोडवरील जय महाराष्ट्र चौक ते फुलसौंदर चौक दरम्यानचा मुख्य रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून तात्काळ दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी श्री गणेश व्यापारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मंडळाने नगर परिषद करमाळा यांच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मेनरोडवरील सदर मार्ग हा शहरातील प्रमुख व वर्दळीचा रस्ता असून ‘सोनार पेठ’ म्हणूनही ओळखला जातो. दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, व्यापारी, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची या मार्गावरून मोठी वाहतूक सुरू असते. मात्र सध्या रस्त्यावर सर्वत्र मोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.
मंडळाच्या म्हणण्यानुसार, मध्यंतरी खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले; परंतु ते निकृष्ट दर्जाचे असल्याने अल्पावधीतच रस्त्याची अवस्था पूर्ववत झाली आहे. परिणामी दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत असून पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम जाणवत आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मंडळाने निवेदनात नमूद केले आहे.
जय महाराष्ट्र चौक ते फुलसौंदर चौक या दरम्यानच्या रस्त्याची संबंधित विभागामार्फत तात्काळ पाहणी करून दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे व नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.दरम्यान, याबाबत नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


