संत निरंकारी करमाळा मिशनतर्फे संगोबा परिसर व सिना नदीपात्राची स्वच्छता
करमाळा प्रतिनिधी सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपेने तसेच सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या पावन स्मरणार्थ ‘अमृत प्रकल्पा’ अंतर्गत देशभर ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या संकल्पनेतून व्यापक नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने संत निरंकारी मंडळ, करमाळा शाखेतर्फे तालुक्यातील श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर तसेच सिना नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले.
महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र संगोबा येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. परिणामी परिसर व नदीपात्र प्रदूषित होते. “प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनो ही हानिकारक होता है,” हा संदेश देत स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.
देशव्यापी उपक्रमांतर्गत एकाच वेळी भारतातील १६०० हून अधिक ठिकाणी नदीपात्रे व सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सत्प्रेरणेने २०२३ पासून ‘अमृत जल प्रकल्प’ संत निरंकारी मिशन व भारत सरकारच्या संयुक्त विचारप्रणालीतून राबविण्यात येत आहे. ‘नरसेवा ही नारायण सेवा’ या उक्तीप्रमाणे हे अभियान मोठ्या श्रद्धेने व निष्काम भावनेने पार पाडले जाते.
या उपक्रमात करमाळा, जातेगाव, कामोणे, पोटेगाव, पांगरे, नेरले, निंभोरे, शेलगाव, उमरड, वाशिंबे, चिखलठाण, दहिगाव, केतूर, जवळा व केडगाव आदी गावांमधून सुमारे २०० महिला-पुरुष व बालगोपाळ सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील कचरा संकलन, नदीपात्रातील प्लास्टिक व अन्य घनकचरा हटविणे, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली.
स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाचे ब्रँचमुखी पोपट थोरात, सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे यांच्यासह महिला व पुरुष सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच आत्माराम वायकुळे, डॉ. भाऊसो सरडे, मुकुंद साळुंखे, अंगद पडवळे, बप्पा धडस, तानाजी चव्हाण, मोहन चोरमले, योगेश चव्हाण, इन्नूस शेख, राजेंद्र भुजबळ, दादा आव्हाड, शिवाजी हजारे, राजू कारंडे आदींनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे संगोबा परिसरात स्वच्छतेचा संदेश रुजला असून, पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली आहे.


