आदिनाथचा इतिहास सांगून उपयोग नाही; गळीत हंगाम कसा सुरू करणार ते सांगा! सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप सोडून कृती आराखडा जाहीर करावा : उपसभापती ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पूर्व इतिहासाची उजळणी करण्याऐवजी सत्ताधारी म्हणून कारखान्याचा गळीत हंगाम कसा सुरू करणार, कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कोणते ठोस नियोजन केले आहे, याबाबत जनतेसमोर भूमिका मांडावी, अशी मागणी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावरून पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर हे सातत्याने विविध राजकीय नेत्यांवर टीका करत असल्याचे दिसून येत आहे. कधी माजी आमदार संजयमामा शिंदे तर कधी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाषआबा गुळवे यांच्यावर टीकेची झोड उठविली जाते. अलीकडे बागल गटालाही लक्ष्य करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. अजित विघ्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “प्रवक्ते तळेकर यांना रोज कोणावर तरी टीका-टिप्पणी केल्याशिवाय करमत नसावे. मात्र आज सत्ता त्यांच्या हातात आहे. आमदारकी आणि कारखानदारी या दोन्ही माध्यमांतून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे.”
विघ्ने पुढे म्हणाले, “आदिनाथचा पूर्व इतिहास सर्वांना माहीत आहे. तो पुन्हा पुन्हा सांगून आता काहीही साध्य होणार नाही. शेतकरी सभासदांनी तुम्हाला सत्ता दिली आहे. त्यामुळे पुढील नियोजन काय आहे, गळीत हंगाम कसा सुरू करणार, कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोणती पावले उचलणार, यावर भाष्य करणे गरजेचे आहे. उगाच वायफळ चर्चा करून शेतकरी आणि सभासदांचे प्रश्न सुटणार नाहीत.”
करमाळा पंचायत समितीत सध्या बागल गट आणि शिंदे गट एकत्र कार्यरत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जगताप गटासह मोहिते-पाटील गटातील अनेक दिग्गज नेत्यांनीही शिंदे-बागल आघाडीला साथ दिली होती. त्यामुळे आदिनाथच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासाच्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे विघ्ने यांनी सांगितले.
“एकमेकांवर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा करमाळा तालुक्याच्या विकासकामांमध्ये भर घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केले पाहिजे. शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणे ही काळाची गरज आहे,” असेही ॲड. विघ्ने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आदिनाथ कारखान्याच्या भवितव्याबाबत शेतकरी व सभासदांमध्ये उत्सुकता असून, आगामी गळीत हंगामाबाबत सत्ताधाऱ्यांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


