Tuesday, June 23, 2026
Latest:
आध्यात्मिककरमाळा

करमाळ्यात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्यावतीने 2 जुलै रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन २९ वे वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाने शहर होणार भक्तिमय

करमाळा, प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा २७ व्या वर्षी करमाळा शहरात आगमन होत असून, त्यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २७ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सेवाकार्यात यंदाही मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे आगमन गुरुवार, दि. २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करमाळा शहरात होणार आहे. पालखी आगमनानंतर सायंकाळी ८ वाजता महाआरती होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी पारायण व प्रवचन, तर रात्री हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहामध्ये विविध प्रवचनकार, कीर्तनकार आणि भजन मंडळे सहभागी होऊन भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे कालनिर्णयात्मक कीर्तन होणार आहे. याशिवाय करमाळा तालुक्यासह परिसरातील अनेक हरिभक्त, कीर्तनकार आणि भजन मंडळे या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणार आहेत.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्याचे हे २९ वे वर्ष असून, या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण करमाळा शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!