भूतकाळ विसरा, भविष्य घडवा बाल न्याय मंडळातून बाहेर पडलेल्या युवकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
सोलापूर, शहर प्रतिनिधी. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या युवकांसाठी एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिविक्षा व पश्चात काळजी संघटनेच्या निरीक्षण गृहात झाली. यावेळी भूतकाळ विसरा, भविष्य घडवा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा न्या. अश्विनी बिराजदार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रज्ञा खेंदाड, गीता तळकोकूळ, बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, सदस्या सुवर्णा कोकरे, सायबर सुरक्षा विभागाचे अविनाश पाटील, सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रारंभी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती देत युवकांना राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान व देशभक्तीची भावना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी युवकांना ‘हर घर तिरंगा’ची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यशाळेत सायबर सुरक्षा, करिअर व व्यवसाय मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, बालकांशी संबंधित कायदे, बाल न्याय अधिनियम २०१५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सुरक्षा विभागाच्या अविनाश पाटील व प्रांजली काळे यांनी ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत माहिती दिली. कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे लोकेशन प्रमुख अतुल भालेराव यांनी शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय जिल्हा महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. सारिका हुक्केरी आणि कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे अभय जगताप यांनी केला.
……………….
चौकट
व्यसनांचे दुष्परिणाम व सकारात्मकतेच धडे
सारथी फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम व सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रज्ञा खेंदाड यांनी बालकांशी संबंधित कायद्यांबाबत, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी बाल न्याय अधिनियमाबाबत, तर बाल कल्याण समितीच्या सदस्या सुवर्णा कोकरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी बिराजदार यांनी युवकांशी संवाद साधून त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक विचारसरणी याबाबत मार्गदर्शन केले.
…………………
चौकट
युवकांसोबत साधला मुक्त संवाद
सहभागी युवकांसोबत स्वतंत्र संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक अडचणी, शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास व भविष्यातील योजनांची माहिती घेण्यात आली. कार्यशाळेत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी युवकांना जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


