Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

कोर्टी ते आवाटी दरम्यानचा रस्ता  या मार्गावर असणारा मोठा अडथळा पाठपुरावा केल्यामुळे दुर झाल्याने मार्चपर्यंत काम पुर्ण होणार  -आमदार संजयमामा शिंदे

 

करमाळा प्रतिनिधी कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम वनविभागाच्या हरकतीमुळे रेंगाळले होते. या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रश्न मार्गी लागलेला असून मार्च अखेर रस्त्याचे सर्व काम पूर्ण होईल असे मत करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले आहे. रस्ता रहदारीसाठी खुला होणार असुन बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांच्याशी चर्चा केलेली आहे. काटेकोरपणे सदर कामाचे नियोजन करण्याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. कोर्टी ते आवाटी या राज्य मार्गाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर सर्वात मोठा समजला जाणारा अडथळा दूर झाला असल्याने कामाने गती घेतली आहे. पुणे, उस्मानाबाद व सोलापूर या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग आहे. मात्र अनेक दिवसांपासून याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. अखेर या मार्गातील अडथळा आता दूर झालेला आहे.
कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जात आहे. आशियाई विकास बँक यांच्या अर्थसहाय्यातून हे काम केले जात आहे. याची हद्द करमाळा तालुक्यात रस्ता किमी १३७/२६० ते १५९/१२० व किमी १६०/ ४७० ते १८९/१२० अशी आहे. या रस्त्यावर करमाळा तालुक्यातील कोर्टी, विहाळ, वीट, रोशेवाडी, करमाळा शहर, श्री देवीचामाळ, पांडे, फिसरे, सालसे व आवाटी ही गावे आहेत.

करमाळा तालुक्यातील गावांसह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांसाठी हा महत्वाचा मार्ग आहे. सिद्धीटेक, तुळजाभवानी व श्री कमलाभवानी या देवस्थानांना जोडणारा हा मार्ग आहे. मात्र अनेक दिवसांपासून यांचे काम रखडले होते. या रस्त्यावरील १०.२९ किलोमीटर क्षेत्र वनविभागाच्या हद्दीत आहे. वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. मात्र आता दुरुस्तीकरणासाठी परवानगी मिळाली असून काम सुरु केले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळ्याचे उपअभियंता के. एम. उबाळे यांनी दिली आहे.
कोर्टी ते आवाटी दरम्यानचे १०. २९ किलोमीटरवर वन क्षेत्र होते. त्यामुळे त्या क्षेत्रावरील काम करण्यासाठी वन विभाग व वन्य जीव प्राणी मंत्रालयाकडून मान्यता हवी होती. परंतु ती मान्यता मिळाली नाही. वनविभागाच्या परवानगीशिवाय ते कामही करता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता संबंधित ठिकाणी दुरुस्ती करण्यास परवानगी मिळाली आहे. आता तेथे कामही सुरु केले असून मार्चपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या मार्गावर आता बऱ्यापैकी काम झाले आहे. पांडे, आवाटी, फिसरे, सालसे परिसरात राहिलेले कामही त्वरित पूर्ण केले जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.वन विभागाकडून रस्त्याच्या कामाची परवानगी देण्यात यावी यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रयत्न केले होते. करमाळा व श्री देवीचामाळ परिसरातील रस्त्याचे काम करण्यास थोडा वेळ लागू शकतो. कारण येथील जलवाहिन्यां सुरळीत ठेऊन काम करावे लागणार आहे. काम करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून काम केले जाणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group