आठ दिवसांत नेरले–गौंडरे रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
करमाळा प्रतिनिधी
नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा येथील अधिकारी श्री. पवार यांना लेखी निवेदन दिले आहे.
नेरले ते गौंडरे रस्त्याचे खडीकरण व कच्चे डांबरीकरणाचे काम सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर होणे अपेक्षित असलेले पक्के डांबरीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. परिणामी, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. काही विद्यार्थ्यांचे सायकल अपघात झाले असून सायकलींचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना सायकल डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने नेरलेहून गौंडरेकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय महाविद्यालयीन शिक्षणासाठी करमाळा, परांडा आणि बार्शी येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परांडा बाजारपेठ जवळ असल्याने दैनंदिन वाहतुकीसाठीही या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी भोसले यांनी केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले की, संबंधित काम सन २०२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार करण्यात आले. मात्र, त्या काळातील परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे नव्याने अंदाजपत्रक तयार करून दर्जेदार आणि टिकाऊ काम करणे गरजेचे होते. रस्त्याच्या कामामध्ये खोदाई, साईड गटार, भराव, मुरमाचा थर, त्यावर तीन इंच जाडीचे दोन स्तरांचे खडीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण अशी प्रक्रिया अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात नियोजनानुसार काम झाले नसल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी भोसले यांनी ऐतिहासिक उदाहरण देत शासनाच्या कामकाजावरही भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले, इमारती, रस्ते आणि पूल तसेच राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील मंदिरे, घाट, रस्ते आणि राजवाडे आजही सुस्थितीत आहेत. मात्र, सध्याच्या काळातील अनेक विकासकामे वर्षभरही टिकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाने अंदाजपत्रकानुसार दर्जेदार आणि मजबूत कामे करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू करावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा स्पष्ट इशारा श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे. नागरिकांमधूनही या मागणीला पाठिंबा मिळत असून संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


