पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेसला थांबा न दिल्यास आता उग्र आंदोलना शिवाय पर्याय नाही -ॲड अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी- पारेवाडी रेल्वे स्टेशन वर एक्सप्रेसला थांबा न दिल्यास आता उग्र आंदोलना शिवाय पर्याय नाही असल्याचे मत ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे . करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महत्वाची बाजारपेठ असणारे पारेवाडी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांनी काही दिवसांपूर्वीच एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन भव्य असा एल्गार मोर्चा काढला होता. यामधे महीला मंडळ, भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी यांचेसह बहुसंख्येने नागरिकाची उपस्थिती होती. सन-१९९७ साली देखिल याच मुद्द्यावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. येथील रेल्वे प्रवासी संघटनेचा देखिल आजपर्यंत सतत पाठपुरावा चालु आहे, तरी देखिल आजपर्यंत कोणीही पारेवाडी रेल्वे प्रवासी बांधवांचा विचार केला नाही. आजही नव्याने सुरु होणाऱ्या हंगलुर ते पुणे गाडी चालु होत आहे परंतु या गाडीला केम व जेऊरला थांबा मिळाला आहे. पारेवाडी रेल्वे स्टेशन मात्र वारंवार वंचित ठेवण्याने काम रेल्वे प्रशासन यांनी केले आहे, आजपर्यंत अनेक रेल्वे मंत्री , खासदार झाले परंतु पारेवाडी रेल्वे स्टेशन ची मागणी कोणीही पुर्ण करू शकले नाहीत. आमचे प्रवाशांना महिला व अबाल वृद्धांना जलद गाडयांसाठी जेऊर किंवा भिगवण ला जाऊन येऊन ५० ते ६० कि.मी बाय रोड जावे यावे लागते हे आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाला सांगितले आहे. मग रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची काळजी नाही असे स्पष्ट दिसुन येते.आम्हाला आता उग्रतेने आंदोलन करूनच आमचा प्रश्न सोडवुन घ्यावा लागेल असे वाटते. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माननीय रेल्वे मंत्री श्री. अश्विन वैष्णव यांना काल ४/१०/२०२३ रोजी देखिल निवेदन दिले आहे, परंतु आमचे प्रवाशांचे मागणीचा अद्यापही योग्य तो विचार झालेला दिसत नाही. आमचेच तालुक्यातील जेऊर, केम स्टेशनला आता चार चार गाडयांना स्टॉप मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे , परंतु पारेवाडी आणि परिसरातील ३५ गावातील ग्रामपंचायतींनी मासिकसभा/ ग्रामसभा ठराव देऊनही रेल्वे प्रशासनाला आमचा गंभीर प्रश्न सुटत नाही, आज १९९७ पासुन आम्ही जी रास्त मागणी करतोय त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. आम्ही एल्गार मोर्चा द्वारे तसेच, ट्विटर , फेसबुक व मिडीयाचे माध्यमातुन देखिल रेल्वे प्रशासन तसेच खासदार व रेल्वे मंत्र्याना निवेदन दिले आहे. आमचे येथे गाडी थांबविणारच असे ठोस आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे. परंतु याऊपरही जर जलद गाडीला स्टाप मिळाला नाही तर आमचा रोष मतदानातुन तर दाखवुच आणि आमची मागणी मान्य होइपर्यंत आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला आहे.
