करमाळा

सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे; जिल्हा परिषद, पंचायत समितीत चांगल्या कार्यकर्त्यांना संधी – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी 
आपल्या गटात समाजासाठी झटून काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असून सर्वच कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत, असे प्रतिपादन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. जेऊर (ता. करमाळा) येथे आयोजित पाटील गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह आदिनाथ साखर कारखान्याचे सर्व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यक्षम व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पंचायत समितीवर आपली सत्ता आवश्यक आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून पत्रा दांड्यापासून घरकुलांपर्यंतचे लाभ वंचित व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील, असेही त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांची सत्ता बाजूला सारून यापूर्वी पंचायत समितीवर आपल्या गटाची सत्ता आली होती. पुन्हा एकदा पंचायत समितीवर पाटील गटाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आदिनाथ साखर कारखाना ताब्यात येऊन अवघे सहा महिने झाले असून, कारखाना सुरू करण्यासाठी आपण व सर्व सहकारी संचालक कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. भविष्यात या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही विश्वास व विजयाची परंपरा कायम राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यात करमाळा व माढा तालुक्यातील ३६ गावांमधील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आपली मते मांडली. पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पाटील गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच युवानेते पृथ्वीराज पाटील मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले, तर आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!