भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांच्या पुढाकारातून करमाळा तालुक्यात प्रथमच CNG पंपाचा भव्य ६ फेब्रुवारी रोजी शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्याच्या औद्योगिक, वाहतूक तसेच पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात असून, तालुक्यात प्रथमच CNG पंपाची सुविधा उपलब्ध होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली दिगंबररावजी बागल पेट्रोलियम, करमाळा यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक CNG पंपाचा भव्य शुभारंभ शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
करमाळा–टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील देवळाली (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे हा CNG पंप सुरू होत असून, त्यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत CNG इंधन भरण्यासाठी वाहनधारकांना सोलापूर किंवा इतर दूरच्या ठिकाणी जावे लागत होते. आता ही सुविधा थेट करमाळ्यात उपलब्ध झाल्याने वाहनधारकांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार आहे.
CNG हे इंधन पर्यावरणपूरक, किफायतशीर व प्रदूषणमुक्त असल्याने दिवसेंदिवस त्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील पहिल्याच CNG पंपाचे उद्घाटन हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. या सुविधेचा लाभ खासगी वाहनांबरोबरच प्रवासी वाहतूक, व्यावसायिक वाहने तसेच शेतमाल वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांच्या पुढाकारातून CNG पंपाची सुरुवात होत असून, करमाळा तालुक्यात आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे करमाळा तालुका हरित ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.
श्री. दिगंबररावजी बागल पेट्रोलियमच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा, सुरक्षित इंधनपुरवठा तसेच आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प ॲड विक्रांत घुमरे आशुतोष घुमरे व्यवस्थापक ज्ञानेश पाटोळे यांनी व्यक्त केला आहे. या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक, व्यापारी, वाहनचालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या CNG पंपाच्या उद्घाटनामुळे करमाळा तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, पर्यावरणसंवर्धन व शाश्वत विकासाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


