Saturday, April 25, 2026
करमाळा

करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांच्या वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; करमाळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपातून समाजाभिमुख संदेश

करमाळा प्रतिनिधी:
दिखाव्याच्या वाढदिवसांना छेद देत समाजाभिमुख आणि प्रेरणादायी संदेश देणारा आदर्श उपक्रम करमाळा शहरात राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने नगरसेवक तथा करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय उर्फ पप्पू सावंत यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे “वाढदिवस म्हणजे समाजाला काहीतरी परत देण्याची संधी” हा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
एकदंत मंगल कार्यालय येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या, प्रभावी आणि विचारप्रवर्तक शैलीमुळे उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवर मंत्रमुग्ध झाले.
जीवनाचा अर्थ स्पष्ट करताना प्रा. शिंदे म्हणाले, “आयुष्य खूप मोठं नाही; पण ते कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगलात, तरच जीवन सुंदर आणि समाधानकारक वाटते.” स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनशैलीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “ध्येय असणं आवश्यक आहे; मात्र त्या ध्येयासाठी मर्यादेपलीकडे मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. संघर्षाशिवाय यश नाही आणि यशाशिवाय समाधान नाही.”
जीवनाच्या अनिश्चिततेवर प्रकाश टाकताना त्यांनी ‘आज’ जगण्याचा संदेश दिला. “आज आपण आहोत, उद्या असूच याची खात्री नाही. त्यामुळे ‘उद्यावर’ गोष्टी ढकलू नका; ‘आज’ जगायला शिका. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा,” असे ते म्हणाले. तुलना, हेवा आणि अति स्पर्धेमुळे माणूस असमाधानी राहतो, असे नमूद करत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, कृतज्ञता आणि समाधान यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, “मुलांना फक्त शिक्षण देणं पुरेसं नाही, तर त्यांच्या स्वप्नांना बळ देणं अधिक गरजेचं आहे. ‘तू तुझे ध्येय पूर्ण कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’ असा आत्मविश्वास दिल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.” तसेच जीवनातील प्रत्येक लढाई लढणे गरजेचे नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच खरे शहाणपण असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
दरम्यान, संजय उर्फ पप्पू सावंत यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत प्रा. शिंदे म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्याचा हा खरा अर्थ आहे. समाजाला परत देण्याची भावना जपली, तरच समाजकारणाला खरी दिशा मिळते.”
करमाळा शहराच्या विकासाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, “करमाळ्याला महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही शहर विकसित होऊ शकते. यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आणि सकारात्मक नेतृत्व आवश्यक आहे.”
या कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते विलासराव घुमरे, प्रा. गणेश शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड यांच्या उपस्थितीत संजय उर्फ पप्पू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत, विठ्ठल आप्पा सावंत, गोपाळ बापू सावंत, महादेव फंड, दादासाहेब सावंत, नगरसेवक दीपक चव्हाण, सौ. चैताली सावंत, अमोल परदेशी, हुमरान मुलानी, सिद्धेश लावंड, पिल्लू इंदलकर, संदीप कांबळे, प्रवीण कटारिया, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे, विवेक येवले, अशपाक सय्यद, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा तालुका अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक शाखा) तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किशोर कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, देवा लोंढे, झनकसिंग परदेशी, अजितसिंग परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत विनोद महानवर यांनी केले, तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन संजय खारगे गुरुजी यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!