Saturday, June 27, 2026
Latest:
Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक सचिन गायकवाड यांचे मेहुणे ओम लाड यांची भारतीय व्हाॕलीबाल संघाच्या कर्णधारपदी विक्रमी कामगिरी; महाराष्ट्रातील पहिला खेळाडू म्हणून मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सचिन गायकवाड यांचे मेहुणे ओम वसंत लाड यांनी भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघात स्थान मिळवणारे आणि संघाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू म्हणून त्यांनी मानाचा तुरा मिळवला असून त्यांच्या या यशामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या बहरीन येथे सुरू असलेल्या एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल नेशन्स कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने कर्णधार ओम लाड यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत सलग सहा सामने जिंकण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे. यजमान बहरीन संघावर भारताने २५-२१, २५-१६, २५-२२ अशा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. या शानदार विजयामुळे भारतीय संघाची स्पर्धेतील आगेकूच अधिक भक्कम झाली असून ओम लाड यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातून पुढे आलेल्या ओम लाड यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रबळ जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाटेगावसारख्या ग्रामीण भागातून भारतीय संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भारतीय संघातील त्यांची निवड आणि कर्णधार म्हणून केलेली विक्रमी कामगिरी ही केवळ अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे राज्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.
ओम लाड यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सचिन गायकवाड, त्यांच्या कुटुंबीयांसह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही ओम लाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक यश संपादन करून देशाचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!