वीजबंदीने विद्यार्थ्यांचा अभ्यास अंधारात रात्रीचा शेती वीजपुरवठा पूर्ववत करण्याची श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतीसाठी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीजपुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, रात्रीचा शेती वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी नेरलेचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या करमाळा कार्यालयातील अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतात वास्तव्यास असून सायंकाळी ६ ते १० ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची महत्त्वाची वेळ असते. मात्र, याच वेळेत वीज बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास खोळंबत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.
वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांना जनावरांची देखभाल, शेतीची कामे आणि इतर दैनंदिन कामे अंधारात करावी लागत आहेत. त्यामुळे सर्प व इतर वन्य प्राण्यांचा धोका वाढत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री १० नंतर वीज सुरू होत असली तरी त्याचा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ होत नसल्याचे राजेभोसले यांनी नमूद केले.
रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी महावितरणकडे ठराव व निवेदने सादर करून सामूहिक पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन महावितरणने हा निर्णय तातडीने बदलावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


