करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठाण आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*
करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पारंपरिक उत्सवांची शान असलेल्या दहीहंडी सोहळ्याला यंदा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा दहीहंडी उत्सव तालुक्यातील सर्वात मोठा ठरला. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या दहीहंडी उत्सवाने करमाळ्यातील जनतेला एकत्र आणत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप सरचिटणीस सचिन शिंदे, जेष्ठ नेते राजकुमार (नाना) पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उपक्रमाचे कौतुक करताना परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधणाऱ्या या उत्सवाला शुभेच्छा दिल्या, उत्सवात युवकांचा सहभाग लक्षणीय होता. तालुक्यातील विविध भागातून गोविंदा पथके मोठ्या उत्साहात करमाळ्यात दाखल झाली होती. ‘आकाशाला भिडणारी मानवी रचना’ साकारून गोविंदांनी दहीहंडी फोडताना दाखविलेली ताकद, शिस्त आणि टीमस्पिरिट पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
शिवशंभु गर्जना चे अभिजीत जाधव व अनु जाधव यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम, ढोल-ताशा पथकांचे वादन आणि डॉल्बी सिस्टीमवर वाजणारे गजर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. संपूर्ण करमाळा शहरात दिवसभर उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांनी, लहानग्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेतला. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी या ठिकाणी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले,“दहीहंडी हा केवळ करमणुकीचा सोहळा नसून त्यामध्ये एकतेचा, धैर्याचा आणि चिकाटीचा संदेश दडलेला आहे. युवकांनी परंपरेला जोडून समाजकार्यातही आघाडी घ्यावी, हाच या उत्सवाचा खरा उद्देश आहे.”या उत्सवामुळे करमाळ्यातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. विविध गावांमधून आलेल्या पथकांनी, प्रेक्षकांनी व मान्यवरांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय बनविला. करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव या नावाला साजेसा ठरला.


