पोंधवडी ते उमरड ग्रा.मा.क्रमांक-२७२ रस्त्या बाबत महत्वपुर्ण निकाल, अखेर रस्त्याचे काम चालु होणार.. रस्ता शासनाचा असल्याचे झाले सिद्ध
करमाळा प्रतिनिधी- मौजे. पोंधवडी ता- करमाळा, जि
सोलापुर येथील सार्वजनिक मालकीचा सन-१९७२ सालापासुन असलेला उमरड ते पोंधवडी रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांमधे गेली अनेक वर्षापासुन वाद निर्माण झालेला होता. सदरच्या वादाची पार्श्वभुमी पाहता केवळ राजकारणातील कुरघोड्या होऊन आणि तहसिलदार करमाळा यांचेकडे चुकीच्या पद्धतीने अर्ज पुरावे सादर केल्याने न्यायनिर्णय पारित झाले होते. वास्तविक सदरचा रस्ता हा शासकीय असल्याची माहीती लपवुन चुकीच्या पद्धतीने खाजगी मालकी आणुन रस्त्याला आडथळे आणले गेले. सदर च्या रस्त्यावर पुर्वीपासुन शासनाने वेळोवळी खडीकरण, मुरुमीकरणाची कामे केलेली आहेत. या रस्त्यासाठी निधी मंजुर होऊन त्याचे कामही चालु झाले होते परंतु त्याला प्रकरणातील वादी व ग्रामस्थ कुंडलिक नवगिरे यांनी दोनशे फुट अंतरातील शेतजमिन माझ्या खाजगी मालकीचे आहे असे भासवुन दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता या दाव्यात गावातील काही ग्रामस्थांसह शासनाला देखिल पक्षकार करण्यात आले होते. याबाबतचा वाद हायकोर्टा पर्यंतही गेलेला होता परंतु नामदार हायकोर्टाने स्थानिक कोर्टातील प्रकरण तातडीने संपविणे बाबत व योग्य ती कार्यवाही करणे बाबत सुचित केले होते. त्यामुळे करमाळा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथील दाव्याचे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीलेले होते. यामधे तक्रारदार वादी यांचे विधिज्ञ म्हणुन ॲड. सुनील रोकडे तर सरपंच,ग्रामस्थ यांचेकडून ॲड. बी. टी.हिरडे यांनी कामकाज पाहिले तर शासनातर्फे ॲड. अजित विघ्ने यांनी काम पाहीले आहे. सदरील प्रकरणात दोन्हीही बाजुने जोरदारपणे युक्तिवाद करण्यात आले होते. यावेळी सदरचा रस्ता पुर्वीचा पाणंद रस्ता असुन त्यालाच आता ग्रामिण मार्ग क्रमांक-२७२ असे संबोधले जात असलेबाबत व या रस्त्याकरिता मंजुर असलेला निधी,टेंडर, कामाची वेळोवेळी दिलेली देयके यासह शासनाची परिपत्रके सादर करण्यात आली होती. त्यामुळे पोंधवडी ते उमरड ग्रामिण मार्ग क्रमांक-२७२ हा रस्ता मुळीच कोणाची खाजगी मालमत्ता आहे असे म्हणता येणार नाही. असा युक्तिवाद शासनाचे वकीलांमार्फत करण्यात आला होता. सर्वाचे युक्तिवाद, पुरावे पाहुन दिवाणी न्यायाधिश व.स्तर श्री. संजयजी घुगे साहेब यांनी निर्णय पारित करताना वादी व प्रतिवादी ग्रामस्थ यांचेतील वाद प्रकरणातील तहसिलदार करमाळा यांचा झालेला तथाकथित आदेश रद्दबातल ठरवत वादीची शासनाविरुद्धची निरंतर ताकीदीची मागणी फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे वादातीत रस्ता हा शासनाचा असुन त्याबाबत ग्रामस्थांनी वाद घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नसलेबाबत नमुद केले आहे. त्यामुळे पोंधवडी ते उमरड ग्रा. मा.क्रमांक-२७२ चे रखडलेले काम चालु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर प्रकरणी गावचे सरपंच व ग्रामस्थांनी ॲड. अजित विघ्ने व ॲड. बाबुराव हिरडे यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.
*पोंधवडी ते उमरड ग्रामिण मार्ग क्रमांक-२७२ या रस्त्याचे काम गेली बरेच वर्षापासुन रखडलेले होते ते आता विना अडथळा चालु होईल. माननीय कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असुन सर्वसामान्य नागरिकांचे सार्वजनिक हिताचा आहे असे मत उपअभियंता जि. प. बांधकाम उपविभाग करमाळा यांनी व्यक्त केले आहे.*


