Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

श्रमसंस्कार शिबिर हे व्यक्तिमत्त्व घडणीची प्रभावी प्रयोगशाळा – विलासराव घुमरे सर

करमाळा प्रतिनिधी :श्रमसंस्कार शिबिर हे केवळ उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीची प्रभावी प्रयोगशाळा आहे असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, शिस्त, सामाजिक जबाबदारी, संस्कार तसेच समाजात वावरण्याचे भान विकसित होते. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून समाज समजून घेण्याची संधी या शिबिरामुळे मिळते. अशा उपक्रमांतूनच समाजभान जपणारे, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतात, असे त्यांनी ठामपणे नमूद
केले .यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने देवळाली येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयीन शिक्षणाचा खरा अर्थ श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना उमगतो. ग्रामीण भागातील वास्तव समस्या प्रत्यक्ष अनुभवातून समजतात आणि त्या समस्यांविषयी सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यामुळे स्वयंसेवकांनी सेवा भावनेतून काम करत शिबिर यशस्वी करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिमन्यू माने होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थी दशेपासून ते प्राचार्यपदापर्यंतच्या आपल्या जीवनप्रवासात राष्ट्रीय सेवा योजनेने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा अनुभव कथन केला. एन.एस.एस. मुळेच समाजाशी नाते दृढ झाले आणि नेतृत्वगुण विकसित झाले, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
देवळाली गावचे पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे व्यक्तिमत्त्व विकास कसा घडतो, याबाबतचे अनुभव सांगून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, देवळाली गावचे तलाठी अमोल यादव, ग्रामसेवक दत्तात्रय निकम, मुख्याध्यापक भैरू गभाले, माजी सरपंच आशिष गायकवाड, विद्यमान सरपंच मा. पोपट बोराडे, कनिष्ठ विभागाचे एन.एस.एस. प्रमुख प्रा. लक्ष्मण राख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि. २३ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिरात स्वच्छता अभियान, स्वच्छ गाव–सुंदर गाव, वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती व जनजागृती, आरोग्य तपासणी, पशुलसीकरण, पशुसंवर्धन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधीर मुळीक यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजया गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!