महाराष्ट्र राज्याने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सक्षम नेतृत्व गमावले – आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक प्रभावी, निर्णयक्षम आणि सक्षम नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाची उणीव केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राला ती जाणवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नारायण आबा पाटील म्हणाले, “अजितदादा पवार यांचे पाटील कुटुंबाशी अतिशय आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणतेही काम घेऊन गेल्यास ते तात्काळ मार्ग काढत असत. मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, तेव्हा ‘नारायणराव’ म्हणून प्रेमाने स्वागत करणारे अजितदादा दिलखुलास, रोखठोक आणि स्पष्ट वक्तृत्वाचे व्यक्तिमत्त्व होते.”
त्यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना पाटील यांनी सांगितले की, अजितदादा हे निर्णय घेण्यात कधीही मागेपुढे पाहत नसत. प्रशासनावर पकड, विकासाकडे पाहण्याची स्पष्ट दृष्टी आणि कामाचा प्रचंड वेग ही त्यांची ओळख होती. त्यामुळेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी होती.
“त्यांच्या जाण्याने केवळ आमचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी सहज भरून निघणारी नाही,” असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर जेऊर–करमाळा तालुक्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून, तालुक्याच्या वतीने दुखवटा पाळण्यात आला आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


