Tuesday, June 30, 2026
Latest:
करमाळा

रेश्मा विजयकुमार जाधव यांना मानाचा ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार–२०२६’ प्रदान

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी करत संगीत, योगसाधना, साहित्य आणि सामाजिक कार्य या चारही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या करमाळ्यातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व रेश्मा विजयकुमार जाधव यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शांतीदूत परिवार, डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन आणि इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजोपयोगी कार्य, संगीत साधना, योग शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व निःस्वार्थ योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, शांतीदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल जाधव (IPS) आणि डॉ. सुरेश राठोड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना रेश्मा जाधव म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या आजवरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रवासाची मोठी पावती आहे. या सन्मानामुळे समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही संगीत, योग आणि साहित्याच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.”
या पुरस्कारामुळे रेश्मा जाधव यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून त्यांच्या यशाबद्दल करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे करमाळ्याच्या नावात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!