आषाढी वारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या वारकऱ्यांना सर्व सुविधा देणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार व्यापक नियोजन- तहसीलदार शिल्पाताई ठोकडे
करमाळा, प्रतिनिधी : आषाढी वारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून लाखो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा तालुक्यातून रावगाव येथे १८ जुलै रोजी मुक्कामी असून १९ जुलै रोजी सकाळी करमाळा शहरातुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, ग्रामपंचायती आणि करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
पालखी मार्गावरील प्रमुख ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती आरोग्य तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका सेवा, स्वच्छतागृहे आणि विश्रांती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दिंडी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
यंदाही विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी अन्नदान, पाणीपुरवठा आणि वैद्यकीय मदत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे करमाळा शहरातील राशीनपेठ तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
मात्र, भोजन व्यवस्थेसोबतच स्वच्छतेच्या बाबतीत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय राठी महाराज यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. याची गंभीर दखल घेत राशीनपेठ तरुण मंडळाची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात येणार असून भोजन केंद्र आणि पालखी मार्ग परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले.
दरम्यान, करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष रस्ते स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था आणि इतर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शेगुड येथे खंडोबा आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या भेट सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यामुळे वारकऱ्यांना चालताना अडचणी निर्माण होतात तसेच स्वच्छतेच्या समस्या वाढतात. त्यामुळे यंदा स्वागत सोहळ्यात भंडाऱ्याचा वापर मर्यादित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित संस्था, ग्रामस्थ आणि पालखी सोहळा समितीशी समन्वय साधून याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे तहसीलदार ठोकडे यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर वातावरण उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार प्रत्येक यंत्रणा सज्ज असून कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ दिली जाणार नाही,” असे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या निमित्ताने करमाळा शहर आणि परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून प्रशासन, नगरपालिका, सामाजिक संस्था आणि नागरिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी एकजुटीने सज्ज झाले आहेत.


