शेतकऱ्यांच्या शेती पंप व घरगुती विजेचा चालू असलेला खंडित करण्याचा पोरखेळ थांबवा वीजपुरवठा सुरळीत करा- आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी अगोदरच अडचणीत असताना, सध्या वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली विज बिल वसुली अन्यायकारक असून, महावितरण कडून शेतीपंप व घरगुती वीज बंद करण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवावे. व वीज जोडणी पूर्ववत करावी. अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी केली आहे. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊसच एवढा होता की शेताला पाणी लागले आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी विजेचा वापर ही शेतकऱ्यांना करता आलेला नाही. असे असताना ही शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे हे चुकीचे आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना, त्याला विज बिल भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे. तसेच विज बिल भरणे विषयी पूर्वसूचना ही महावितरण कंपनीने द्यायला हवी. असे कोणतेच काम महावितरण कंपनीने केलेले नाही. सरसकट वीज बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ही अन्यायकारक वसुली तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी ,बँका ,शासकीय कार्यालय यांना ही काम करण्यास अडचणी येत आहे .त्यामुळे महावितरण कंपनीने या सर्व बाबींचा विचार करून वीज तोडणी थांबवावी, व विज जोडणी पूर्ववत करावी. अशी मागणी आ. शिंदे यांनी केली आहे.
