करमाळा

करमाळ्याच्या भाविकांना चारधाम यात्रा करतो म्हणून यात्रेचे पैसे घेऊन साडेबारा लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा प्रतिनिधी
चारधाम यात्रा घडवून आणतो म्हणून पुणे येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या चार संचालकानी करमाळा येथील 50 भाविकांना तब्बल साडे बारा लाख रुपयाचा गंडा घालून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे सर्व राहणार धायरी जिल्हा पुणे व बालाजी सूर्यवंशी रा वडगाव बु तालुका हवेली जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याची फिर्याद प्रफुल्ल प्रदिप शिंदे वय 33 रा.किल्ला वेस करमाळा यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.
याबाबतची हकीकत अशी की, करमाळा येथील 50 भाविकांनी चारधाम यात्रा करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये 50 भाविकांनी मिळून एकमेकांना सांगून पुणे येथील ड्रीम कस्टर टूर्स ट्रॅव्हल्स हा व्यवसाय करणाऱ्या कंपनीला फेसबुकच्या माध्यमातून शोधून काढून सहलीचे नियोजन केले होते .
यामध्ये ट्रॅव्हल कंपनीचे चारही संचालकाशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क केला. या टूर्स च्या आयोजकांनी प्रत्येकी 25 हजार रुपये प्रवास खर्च सांगून पुणे ते चारधाम ठिकाणी यात्रा करण्याचे ठरवले होते. यामध्ये दहा दिवस व अकरा रात्री असा प्रवास करण्याचे व प्रवासातील सर्व खर्च हा ट्रॅव्हल व्यवसाय कंपनीने करण्याचे ठरले होते. यामध्ये पुणे ते दिल्ली असा विमानाने व हेलिकॉप्टर ने केदारनाथ पायथा ते केदारनाथ मंदिर असा प्रवास करण्याचे ठरले होते. यामध्ये हरिद्वार ,बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असा बसनेही प्रवास ठरलेला होता. याबाबत 50 भाविकांनी विविध माध्यमातून 12 लाख 50 हजार रुपये या यात्रा कंपनीकडे भरले होते. ठरल्याप्रमाणे यात्रा 4 मे चे प्रस्थान वरील संशयित आरोपींनी चार धाम यात्रा विविध कारणे देऊन रद्द केली होती. यामध्ये खराब हवामान,बर्फ वर्षाव तसेच वेगवेगळी कारणे दिली होती. याबाबत भाविकांनी संबंधितांना यात्रेविषयी विचारणा केली असता त्यांनी आता ही यात्रा रद्द करण्यात आल्याचे सांगितले व पुढील तारीख कळवतो किंवा पंधरा दिवसात तुमचे पैसे माघारी देतो असे 7 मे 23 रोजी सांगितले होते. यासाठी या संचालकांनी करमाळा येथे ही पाच सहा वेळा येऊन सर्वांना चारधाम यात्रेबाबत ट्रॅव्हलीग बॅगा देऊन विश्वासात घेतले होते. सर्वांचा विश्वास ही संपादन केला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी पैसे तर परत दिलेच नाही व 4 मे ते 15 मे दरम्यान आयोजित चार धाम यात्रा ही घडवली नाही. व करमाळ्यातील या 50 भाविकांची आर्थिक फसवणुक केली. याउपर संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या आयोजकांनी तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तुमचे पैसे माघारी देऊ शकत नाही असे सांगितल्याने या 50 भाविकांनी करमाळा पोलीस ठाण्यात 5 जुन रोजी धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी आषाढी वारीचे कारण देत गुन्हा दाखल केला नसल्याचे भाविकांनी सांगितले. तब्बल महिना उलटून गेल्यानंतर आज करमाळा पोलिसात चार ही संशयित आरोपींच्या विरोधात भादवी 420/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक जगताप हे पुढील तपास करीत आहेत .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group