अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघासाठी किती निधी मिळाला ? याचं उत्तर आधी द्या…संजयमामांचे आवाहन .
करमाळा प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात करमाळा मतदारसंघासाठी
किती निधी मिळाला? याचं उत्तर आधी जनतेला द्या असं जाहीर आवाहन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार नारायण पाटील यांना केले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने पारेवाडी येथे आयोजित जाहीर सभे प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मार्च महिन्यातील अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो त्यामध्ये वर्षभरातील निधीचे नियोजन होत असते. पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीला मर्यादा असते .असे असताना ही चालू अर्थसंकल्पात करमाळा मतदारसंघासाठी नारायण पाटलांना दमडीदेखील मिळविता आली नाहीय यावरूनच त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वकुब जनतेच्या पुन्हा एकवार लक्षात आलेला आहे.
गेल्या पाच वर्षांनंतर हे झालेलं पहिलंच असं अधिवेशन आहे की ज्यामध्ये या मतदारसंघाला विकासकामांसाठी शब्दशः रुपयादेखील विद्यमान आमदार मिळवू शकलेले नाहीत.असं असताना माझ्या
कार्यकाळात मी आणलेली बहुसंख्य विकासकामे, प्रकल्प आदी कामे सध्या जोमाने सुरू असताना केवळ त्या कामांमध्ये टक्केवारी मिळण्यासाठी ही कामे बंद पाडणे,अडथळे निर्माण करणे असे उद्योग नारायण पाटील व त्यांचे साथीदार करत आहेत.दहिगाव योजनेचे
पाईप कोणी जाळले,कोणाच्या सांगण्यावरून गेले तीन महिने हे काम बंद पाडण्यात आलेय हे आता जगजाहीर
झालेले आहे.राजकारण हा तुमचा पहिल्यापासूनच पोट
भरण्याचा धंदा आहे हेही जनतेला ठाऊक आहे.त्यामुळं
आता आमदार या नात्याने शासन दरबारी तुमची पत दाखवून विकासकामांसाठी निधी आणा आणि मग त्यात
चमच्याने नव्हे तर बचक मारून पैसे खा,पण सुरू असलेली विकासकामे बंद पाडण्याचे दुष्कर्म करून शेतकरी,सामान्य जनतेचा तळतळाट घेऊ नका! असे जाहीर आवाहन संजयमामा शिंदे यांनी आमदार पाटील यांना केले आहे.
उजनी धरणात अवघे 20 टक्के पाणी शिल्लक आहे .अजून दहिगाव चे पाणी टेल भागामध्ये पोहोचले सुद्धा नाही. पाणी पाणी म्हणून मतदारसंघातील जनता आता आंदोलनाच्या पवित्र आहे. यातून थोडा तरी धडा लोकप्रतिनिधींनी शिकणे अपेक्षित आहे. तोंड पाहून पाणी देणे, मत कमी जास्त दिली म्हणून एखाद्या गावाला पाणी नाकारणे याच्यासारखं पाप दुसरं कोणत नाही.असलं राजकीय पाप लोकप्रतिनिधीने करू नये.
