करमाळा

करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

 

करमाळा प्रतिनिधी 
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता अमली पदार्थमुक्त भारतासाठी अमली पदार्थ जागरूकता, निरोगी जीवनशैली, युवक दिन व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. एस. एम. घुगे, दिवाणी न्यायाधीश उपस्थित होते. कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून IPS अधिकारी कु. अंजना कृष्णा यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्र. प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विचार व्यक्त करताना सांगितले की, आजचा स्वतंत्र आणि प्रगत भारत घडण्याचे श्रेय राजमाता जिजाऊ साहेबांना जाते. त्यांनी बाल शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले आणि ते जोपासले. रयतेविषयी आपुलकी, महिलांचा सन्मान आणि न्यायप्रियता हे संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवर केल्यामुळेच ते जगातील इतर राजांपेक्षा वेगळे ठरले.
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने बोलताना डॉ. अभिमन्यू माने यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार उद्धृत करत सांगितले की, देशाची समृद्धी आणि प्रगती घडविण्याची खरी ताकद ही देशातील युवकांमध्येच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेले आदर्श, मूल्ये आणि मार्ग अंगीकारले पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आकर्षण IPS अधिकारी कु. अंजना कृष्णा ठरल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे विचार प्रभावीपणे मांडले. “तुम्ही आयुष्यात जे व्हायचे ठरवाल ते नक्कीच व्हाल. विद्यार्थ्यांनी नेहमी कठीण आव्हाने स्वीकारली पाहिजेत. यश मिळाले तर आनंद साजरा करा, आणि अपयश आले तर त्याची कारणे शोधून त्यातून धडे घेत नव्या जोमाने प्रयत्न करा,” असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे विचार विद्यार्थी मोठ्या एकाग्रतेने ऐकत होते.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. एस. एम. घुगे यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य व विचार विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडले. सदृढ आणि निरोगी युवक ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. “एका वेळी एक काम करा आणि तुमचा संपूर्ण आत्मा त्यात ओता. आयुष्यात जोखीम घ्या; जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तरी मार्गदर्शन कराल,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमात न्यायाधीश श्रीमती एस. पी कुलकर्णी यांची उपस्थिती अत्यंत प्रेरणादायी होती. यावेळी यश कल्याणीचे अध्यक्ष, मा. करे पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. तसेच ॲड. दिवाण, ॲड. यादव देशमुख मॅडम आणि ॲड. मंजरतकर यांनी महिला हक्क, ग्राहक हक्क, अमली पदार्थविरोधी कायदे व विविध सामाजिक कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ए. टी. करपे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!