करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय, करमाळा या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात विविध त्रुटी आढळून येत असून त्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुका शाखेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल डुकरे व शल्यचिकित्सक डॉ. स्मिता बंडगर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधा, मनुष्यबळाची स्थिती तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. त्यानंतर अधीक्षक डॉ. अमोल डुकरे व मेडिकल ऑफिसर तथा शल्यचिकित्सक डॉ. स्मिता बंडगर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. रुग्णालयातील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करून त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी ग्राहक पंचायतीच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधुरी परदेशी, तालुका सचिव अजीम खान, कार्यकारिणी सदस्य संजय हांडे, शिवाजी वीर तसेच जिल्हा प्रबोधन प्रमुख भीष्माचार्य चांदणे उपस्थित होते.
निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देताना डॉ. डुकरे यांनी सांगितले की, रुग्णालयात सध्या सुमारे १४ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर ताण येत आहे. रिक्त पदांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील व रुग्णसेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग आणि प्रसूती विभागाला चांगला प्रतिसाद मिळत असून उपलब्ध मनुष्यबळावर चोख सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भीष्माचार्य चांदणे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ‘क्रिटिकल केअर सेंटर’ सुरू करण्याची मागणी केली. सध्याच्या डॉक्टरांबरोबर तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ व लॅब टेक्निशियन यांची आवश्यकता असून केवळ १०० खाटांची नवीन इमारत उभारून उपयोग होणार नाही, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी सोलापूर, अहिल्यानगर किंवा बार्शी येथे जावे लागू नये, यासाठी अत्याधुनिक सुविधा व यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवाजी वीर यांनी कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगितले. नेत्ररुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करमाळ्यातच व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. गुंतागुंतीचे रुग्ण सोलापूर येथे रेफर करावे लागत असल्याने जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. भीषण अपघातातील जखमी व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुसज्ज अतिदक्षता विभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ग्राहक पंचायतीच्या या मागण्यांमुळे करमाळा तालुक्यातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.


