महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी अतोनात कष्ट उपसले – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
*
औरंगाबाद,दि.९:-महामानव महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांनी देशात आणि महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी अतोनात कष्ट उपसले, महाराष्ट्रात शाळा सुरु केल्या,याच भावना मी पैठण येथील कार्यक्रमात व्यक्त केल्या. महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे,डॉ.बाबासाहेब आणि कर्मवीरांबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा आहे, त्याबद्दल कुणी शंका उपस्थित करण्याचे कारणच नाही,अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.*
महाराष्ट्राच्या शिक्षण प्रसार चळवळीत महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारख्या महापुरुषांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. “शिक्षणासाठी मूठभर धान्य” ही चळवळ वाड्यावस्त्यांवर फिरुन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यशस्वी केली.या चळवळीचा शुभारंभ त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ले या खेडेगावात मूठभर धान्य मागून केला होता.अशाच संदर्भाने महापुरुषांनी महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि शाळा सुरु करण्यासाठी उपसलेल्या अतोनात कष्टा विषयी मी पैठण येथील कार्यक्रमात बोललो. माझ्या आदर आणि श्रद्धेच्या भावनांचा गैरअर्थ लावून कुणीही राजकारण करु नये, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.
