Uncategorized

मकाईच्या ऊस थकबाकीदारांना नवीन वर्ष आशादायक; बुधवारी दि. 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार फैसला- ॲड. राहुल सावंत

करमाळा, प्रतिनिधी – गतवर्षी अनेक हालापेष्टा सहन केलेल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाला नवीन वर्षाची सुरुवात सुखकारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील आठवड्यात करमाळ्याच्या नूतन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे श्री मकाई कारखाना ऊस उत्पादक संघर्ष समिती चे आंदोलक शेतकऱ्यांनी लवकरच ऊस बिले न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन दिले होते. यावेळी तहसीलदार ठोकडे यांनी सदर प्रकरणाची इत्यंभूत माहिती करून घेतली. शिवाय याबाबत पाठपुरावाही केला. या अनुषंगाने श्री मकाई कारखान्याच्या थकीत ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी 26 जानेवारी 2024 रोजी सामूहिक आत्मदहन असल्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पोलीस अधीक्षक ( एस पी ) श्री शिरीष सरदेशपांडे यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलन कर्ते व शेतकरी सोमवार दि. १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी पुन्हा 3 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित अधिकारी व शेतकरी शिष्टमंडळ यांच्या सोबत मीटिंग आयोजित केली असल्याची तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा एस एम एस येईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती आंदोलक नेते ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे.‌

याबाबत अधिक माहिती देताना ॲड. राहुल सावंत यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील प्रशासन ऊस बिल देण्यासाठी वारंवार तारखा देत राहिल्याने व टाळाटाळ करीत असल्याने 28 नोव्हेंबर 2023 रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. बोंबाबोंब आंदोलनादरम्यानची आक्रमक भूमिका व त्यानंतर 8 डिसेंबर2023 रोजी थू थू आंदोलन तसेच भजनी मंडळ , जनावरे सहित ठिय्या आंदोलन करण्यात आले. यादरम्यान हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर २५ डिसेंबर पर्यंतची मुदत मागूनही कोणतीच हालचाल न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही आता कडक धोरण अवलंबण्याचे ठरवले असून बुधवार दि.३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, प्रमुख आंदोलक नेते, प्रादेशिक सहसंचालक (साखर), विधी व न्याय विभागाचे सरकारी वकील, जिल्हा पोलीस अधीक्षक, करमाळा तहसीलदार, पोलिस निरीक्षक करमाळा आणि मकाई कारखान्याचे विद्यमान आणि तत्कालीन चेअरमन, कार्यकारी संचालक, एकत्रित बैठक होणार आहे. त्यामुळे मकाईच्या थकीत ऊस बिलांसाठी दशरथआण्णा कांबळे, ॲड. राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ आणि रविंद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या आंदोलनाला काही अंशी यश आल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत ऊस बीलाची रक्कम जमा झाल्याचा एसएमएस येईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ॲड. राहुल सावंत यांनी सांगितले आहे.

कारखान्याला ऊस जाऊन तेरा महिने उलटून गेल्यानंतरही ऊस बिलाच्या आशेवर निसटते वर्षे तारांबळीत काढलेल्या ऊस उत्पादकांना प्रशासकीय पातळीवर न्याय मिळण्याची शक्यता दिसत असल्याने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या आहेत.

ऊस बिले थकीत राहील्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन आम्ही या आंदोलनात उतरलो. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील कार्यवाही करीता तहसीलदार नसल्यामुळे विलंब झाला असला तरी आता हा विषय जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेल्यामुळे आणि शिस्तप्रिय तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यामुळे ऊस बिले मिळण्यासाठीच्या कार्यवाहीला निश्चितच वेग येणार आहे.
दशरथआण्णा कांबळे,
अध्यक्ष,
शेतकरी संघर्ष समिती,
करमाळा तालुका.

ऊस बिलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांसह आंदोलक आणि कारखाना प्रशासनाची एकत्रित बैठक बोलावली आहे. या बैठकीत बिलांबाबत खरी माहिती समोर येईल. या उपरही बिले मिळण्याची शक्यता दिसून आली नाही तर कायदेशीर कारवाई नुसार पुढील प्रक्रियेला आरंभ करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रा. रामदास झोळ,
शेतकरी नेते,
करमाळा तालुका.

error: Don\'t try to copy. Content is protected !!