लोकसभा मतदारसंघांमध्ये 500 ते 1000 उमेदवाऱ्या दाखल करून ईव्हीएम मशीनला विरोध करावा–प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी आगामी येणाऱ्या लोकसभेच्या माढा मतदारसंघातून कमीत कमी पाचशे व्यक्तींचे उमेदवारी अर्ज लोकवर्गणी करून दाखल करणार असून ते कोणत्याही परिस्थितीत बाद करता येणार नाहीत याची सुद्धा काळजी करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये 500 ते 1000 उमेदवाऱ्या दाखल करून ईव्हीएम मशीनला विरोध करावा असे मत काँग्रेस आय करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना श्री जगताप म्हणाले की आज पर्यंत या विरोधात अनेक आंदोलन झाली मोर्चे निघाले पण याचा आयोगाला कसलाही फरक पडत नाही.सध्या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेणे गरजेचे आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसकडून सलग निवडणुका जिंकूनही त्यांनी ईव्हीएम मशीन वर मतदान घेणे ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे.
बिहार मधील आरजेडी पार्टी देखील सर्वात मोठी पार्टी असून त्यांचा देखील ईव्हीएम मशीनला विरोध आहे. इतकच काय तर 2009 साली भारतीय जनता पार्टीने देखील ईव्हीएम मशीनवर मतदान नको म्हणून निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. वास्तविक पाहता ईव्हीएम मशीन वर जरी मतदान मोजण्यासाठी वेळ कमी लागत असला तरी पाच वर्षातून एकदा होणाऱ्या या निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मतमोजणीसाठी एखादा दुसरा दिवस जास्त लागला तरी काय फरक पडतो असा सवाल ही श्री जगताप यांनी विचारला आहे. याउलट बॅलेट पेपरवर मतदान करत असताना मतदान करणाऱ्याला स्वतः मतदान करून त्या मतपत्रिकेची घडी करून सर्व उमेदवार प्रतिनिधींच्या समोर स्वतः केलेले मतदान बॅलेट बॉक्समध्ये टाकता येते. याउलट ईव्हीएम मशीन वर जरी बटन दाबले तरी त्याच उमेदवाराला नक्की मतदान झाले की नाही हे शंकास्पद ठरते. निवडणूक आयोगाने यामुळे व्हीव्हीपॅट मशीन वरून प्रिंट वर आपण केलेले मतदान हे योग्य झाले का नाही हे जरी दिसत असले तरी व्हीव्हीपॅट मशीन वरून सर्व प्रिंटची मोजणी होत नाही. एखाद्या उमेदवाराने जरी दुबार मतमोजणी करण्याची मागणी केली तरी ईव्हीएम मशीन वर संख्यात्मकच दुबार मतमोजणी करता येते. या उलट बॅलेट पेपरवर एक एक चिठ्ठीचे एकत्र गठ्ठे तयार करून मोजता येते. यामुळे कोणत्याही संख्येला जागा उरत नाही.
अमेरिका ब्रिटन फ्रान्स ऑस्ट्रेलिया जपान या प्रगतशील देशांमध्ये ईव्हीएम मशीन वर मतदान होत नाही. जर्मनी देशांमध्ये तर त्या ठिकाणच्या सुप्रीम कोर्टाने evm मशीन वर मतदान न घेण्याचा निर्णय दिला आहे. आणि खरंतर ईव्हीएम मशीन ची टेक्नॉलॉजी या देशातून आली त्या देशात सध्या ईव्हीएम वर मतदान होत नाही हे खूप शिकण्यासारखे आहे. ईव्हीएम मशीन जर खराब झाली तर ती मशीन टेक्निशियन कडून ठीक केली जाते. मग या मशीन मध्ये विशिष्ट सेटिंग ही का करता येत नसेल ही शंका देशवासियांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे. पूर्वीप्रमाणे देशात पुन्हा एकदा लोकशाही मजबूत करण्यासाठी बॅलेट पेपर वरच मतदान घेण्यात यावे अशी मागणी करमाळा काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री जगताप यांनी केली आहे. शेवटी बोलताना जगताप म्हणाले की मी स्वतः कार्यकर्त्यांसह माढा मतदारसंघात फिरून कमीत कमी पाचशे व्यक्तींचे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या वतीने ही आणखी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या गोष्टीमुळे तरी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला काहीतरी धडा शिकायला मिळेल असा विश्वास शेवटी श्री जगताप यांनी व्यक्त केला.
