करमाळा

युती नको, स्वबळावरच निवडणूक लढवा – राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा संजयमामा शिंदेंकडे आग्रह

करमाळा प्रतिनिधी 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) चा भव्य कार्यकर्ता मेळावा आज (दि. 12) नालबंद मंगल कार्यालय येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात कोणतीही युती-आघाडी न करता संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा एकमुखी सूर कार्यकर्त्यांनी लावला.
मेळाव्यात तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे ॲड. अजित विघ्ने, ॲड. नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित तात्या बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ, दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर आदींनी भाषणांतून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
कुर्डूवाडी नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असून, हाच विश्वास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयात रूपांतरित होईल, असा दावा यावेळी करण्यात आला.
‘माझ्यावर आरोप करण्याआधी विरोधकांनी स्वतःची लायकी तपासावी’
मेळाव्यात बोलताना संजयमामा शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
“माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी. ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, जे केवळ खंडणी व हप्ते मिळत नाहीत म्हणून तहसीलदारांवर हक्कभंग दाखल करतात, कंत्राटदार टक्केवारी देत नाहीत म्हणून दहिगावचे पाईप जाळून विकासकामे बंद पाडतात, असे लोक आज माझ्यावर आरोप करत आहेत,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
आपण विकासकामे करणारा कार्यकर्ता असून जातीचे आणि नात्यागोत्याचे राजकारण कधीच केले नाही व करणारही नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“माझ्या विकासकामांची भीतीच विरोधकांना एकत्र आणत आहे. दोन निवडणुकांत पराभव होऊनही एकही कार्यकर्ता आपल्यापासून दूर गेलेला नाही, हेच आमचे नैतिक बळ आहे,” असे शिंदे म्हणाले.
आदिनाथ कारखान्यात मिळालेल्या लीडचा उल्लेख
विधानसभेनंतर झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 12 पैकी 5 गणांमध्ये लीड मिळाल्याचे व सुमारे 45 टक्के मतदान आपल्याला मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार निश्चितच कौल देतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
कारखाना चालवण्याची पात्रता नाही – सुभाष गुळवे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी नारायण पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
“सभासदांनी विश्वासाने कारखान्याची सत्ता आमदारांकडे दिली; मात्र आमदार व चेअरमन यांचा स्वतःचा ऊस पवारांच्या साखर कारखान्याला जात आहे. अशा नेतृत्वाकडून सभासद शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही,” असा आरोप त्यांनी केला.
हा कारखाना वाचवण्यासाठी आवश्यक ताकद सध्याच्या नेतृत्वाकडे नसल्याने भविष्यात तो निलावात निघण्याची शक्यता असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास मोठी उपस्थिती
मेळाव्यास सुभाष आबा गुळवे, तात्यासाहेब मस्कर, चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, विलास पाटील, तानाजी झोळ, विलास राऊत, अशोक पाटील, विवेक येवले, पोपट सरडे, डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र बाबर, आर. आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!