Thursday, March 26, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा तालुक्यातील घारगावात श्री काळभैरवनाथ यात्रेचा जल्लोष; तमाशा, कुस्ती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील घारगाव येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रोत्सवाचा भव्य सोहळा यंदाही भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक थाटामाटात साजरा होणार आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून सध्या गावात सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेची सुरुवात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळ्याने होणार आहे. या पारंपरिक आणि भावनिक सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते.
शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत सौ. शितलताई पुणेकर यांचा “जय मल्हार” जागरण गोंधळ कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमातून भक्ती आणि लोककलेचा संगम अनुभवता येणार आहे.
शनिवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ग्रामस्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. तर रविवार, दि. २९ मार्च रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. रणजित (बापू) महाराज यांचे कीर्तन होणार असून भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
सोमवार, दि. ३० मार्च हा यात्रेतील मुख्य आकर्षणाचा दिवस ठरणार आहे. पहाटे ५ वाजता देवाचा छबीना (भव्य मिरवणूक) पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी गुंडाप्पा चिवटे यांच्या वतीने आकर्षक आतषबाजी सादर केली जाणार आहे. त्याच दिवशी रात्री प्रसिद्ध दत्ता महाडिक (नारायणगावकर) यांचा लोकनाट्य तमाशा रसिकांचे मनोरंजन करणार आहे.
मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार असून परिसरातील नामांकित पैलवान आपली ताकद आजमावणार आहेत. या कुस्त्यांमुळे यात्रेला पारंपरिक क्रीडा संस्कृतीची जोड मिळणार आहे.
यात्रेदरम्यान बॅण्ड, ताशा, हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचे सूर सतत दुमदुमत राहणार असून गावात सणासुदीचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी घारगाव तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे. या यात्रेमुळे गावात एकोप्याची भावना दृढ होत असून सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!