जमिनीतील जिवाणूंची ताकद ओळखा; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवा – शरद विसपुते *बेंद फाटा येथे ‘केळी पीक व खरीप हंगाम पूर्वतयारी’ परिसंवादाला शेतकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा, प्रतिनिधी : जमिनीतील जिवाणू हे शेती उत्पादनवाढीचे खरे शिल्पकार असून त्यांच्या कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रासायनिक खतांचा वाढता वापर करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जिवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी अभ्यासक श्री. शरद विसपुते यांनी केले.
सकाळ ॲग्रोवन, ॲग्री सर्च आणि राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “केळी पीक व खरीप हंगाम पूर्वतयारी” या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. करमाळा-कुर्डूवाडी रोडवरील बेंद फाटा येथे शनिवारी (दि. ३० मे) झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना श्री. विसपुते म्हणाले की, वनस्पतींना आवश्यक अन्नद्रव्ये जमिनीतून उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सूक्ष्मजीव आणि जिवाणू करीत असतात. मात्र शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिवाणूंची संख्या घटत आहे. परिणामी जमिनीची सुपीकता कमी होत असून रासायनिक खतांचा वापर वाढत चालला आहे. असे असतानाही उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर विशेष भर दिला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, पालापाचोळा, काडीकचरा, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्यास जिवाणूंना आवश्यक अन्न मिळते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची साखळी बळकट होऊन वनस्पतींना अन्नद्रव्ये अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध होतात. शाश्वत शेतीसाठी जमिनीतील जैविक संतुलन टिकविणे अत्यावश्यक आहे.
परिसंवादात जैन इरिगेशन, जळगावचे श्री. किरण पाटील यांनी “निर्यातक्षम केळी व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन, सिंचन व्यवस्थापन आणि निर्यात मानकांची सविस्तर माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादनावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. घनश्याम पेटकर (टेंभुर्णी) यांनी “एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन करताना कीड व रोगांचे प्रारंभीच निदान करून वेळेवर नियंत्रण उपाययोजना केल्यास उत्पादनातील मोठे नुकसान टाळता येते, असे सांगितले. रासायनिक उपायांबरोबरच जैविक आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
कार्यक्रमात नैसर्गिक शेती, केळी पीक व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादन, कीड व रोग नियंत्रण तसेच खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वीर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बिबीशन मस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲग्री सर्चचे श्री. राहुल पाटील यांनी मानले.
चौकट
विषमुक्त शेतीसाठी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचा पुढाकार
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने दहा ड्रम युनिट आणि गांडूळ बेड युनिटसारखी जैविक निविष्ठा निर्मिती केंद्रे सुरू केली आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होत आहेत.
एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळे, प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच डॉ. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ विकसित ‘गोदावरी’ तूर वाण, राहुरी कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स आणि बीजप्रक्रियेसाठी लागणारे साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमांमुळे करमाळा तालुक्यात विषमुक्त, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीची चळवळ अधिक वेगाने विस्तारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


