लोकसहभागातून गावाचा विकास होऊ शकतो – भास्करराव पेरे-पाटील
करमाळा प्रतिनिधी – करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी . पाटील ,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , करमाळा राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व फिसरे ग्रामपंचायत, फिसरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात पाटोदा गावांचे आदर्श सरपंच मा. भास्करराव पेरे- पाटील यांचे आदर्शग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे हे होते. याप्रसंगी पेरे-पाटील यांनी बोलताना लोकसहभागातून गावाचा विकास होऊ शकतो असे सांगितले. तसेच काळाची पावले ओळखून आपण आपल्या वर्तनात परिवर्तन करणे आवश्यक आहे. ज्या सुविधा गावात उपलब्ध करून द्यायच्या असतील त्या सार्वजनिक पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास त्या स्वस्तात मिळू शकतात तसेच गावात झाडे , रस्ते , पाणी , वीज , स्वच्छता त्यांनी दिलेल्या टॅक्सचा पुरेपूर मोबदला त्यांना दिला पाहिजे. स्त्रियांना सन्मान आणि निराधारांना आधार देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी वेळेचे महत्व व भास्करराव पेरे-पाटील यांनी त्यांच्या गावात राबवलेल्या योजना येथे राबवल्या गेल्या तर फिसरे गाव आदर्श गाव बनेल व त्याचा आदर्श इतर गावापुढे राहील असे मत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच संदीप नेटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी अनेक गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक व फिसरे गावचे सरपंच प्रदीप दौडे , उपसरपंच विजय अवताडे , सर्व ग्रामपंचायत सदस्य ‘ विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. एम.डी. जाधव यांनी केले तर आभार फिसरे गावचे ग्रामसेवक केवारे भाऊसाहेब यांनी मानले .
