करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूकीसाठी भाजप–राष्ट्रवादी युती; समसमान जागावाटप, ताकतीने लढणार जिंकणार – सौ. रश्मी दिदी बागल
*
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीतून म्हणजेच महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याची माहिती भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल यांनी दिली. महायुतीच्या या निर्णयाला राज्यस्तरीय नेतृत्वाचा पाठिंबा असून तालुक्यात संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अधिकृत युती करण्यात आली आहे. या युतीअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना समसमान जागावाटप करण्यात आले असून, संपूर्ण निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना सौ. रश्मी बागल म्हणाल्या की, भाजपकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे एकशे सत्तर कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती.त्यामुळे सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसले, तरी पक्षासाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष निश्चितच विचार करेल. भविष्यात अशा कार्यकर्त्यांना योग्य संधी देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवली जाणार असून ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे, असे मत भाजपच्या वतीने वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
स्वतःच्या भूमिकेबाबत बोलताना सौ. बागल म्हणाल्या की, आपल्याला निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असून, पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत. पांडे गटातून निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महायुतीमुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संघटन करमाळा तालुक्यात अधिक बळकट झाले असून, या एकजुटीच्या जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीनिशी लढून जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल यांनी सांगितले आहे.


