यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा २०२६ सुरळीत व शिस्तबद्ध वातावरणात सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षा केंद्रावर (क्र. ०४२१) एकूण ११०४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच अन्य आवश्यक साहित्याची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रावर शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष आहेत.
या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाबरोबरच महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करमाळा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांची उत्साही उपस्थिती पाहायला मिळाली.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विशेष उपक्रम हाती घेतले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता व आत्मविश्वास वाढीस लागल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्र परिसरात शांत व अभ्यासपूरक वातावरण राखण्यात आले असून पालकांचीही केंद्राबाहेर उपस्थिती होती.
सालाबादप्रमाणे यंदाही परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व पारदर्शक पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्र संचालक प्रा. ज्ञानदेव कुंभार, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक तसेच शिक्षकवृंद यांच्या समन्वयातून परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात असल्याचे चित्र केंद्रावर पाहायला मिळाले. पुढील सर्व पेपरही याच शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.


