वाढदिवस विशेष लेख -सर्वसामान्यांतून घडलेले जननेतृत्व : पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा प्रेरणादायी प्रवास
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन केवळ स्वतःपुरते न जगता संपूर्ण गावाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे नाव म्हणजे विष्णू रंदवे. जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी समाजकारण आणि राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शेती आणि पारंपरिक व्यवसाय सांभाळत त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात केली. साधेपणातून आलेली संवेदनशीलता आणि लोकांच्या अडचणींची जाणीव यामुळेच त्यांची पावले समाजकारणाकडे वळली. सुरुवातीला शिवसेना कार्यकर्ता म्हणून ॲड. शिवाजीराव मांगले शाहू दादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम सुरू केले. या काळात त्यांनी संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि लोकांच्या प्रश्नांची जाण आत्मसात केली.
यानंतर स्वर्गीय दिगंबरराव बागल (मामा) यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. बागल गटात कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य जनतेची छोटी-मोठी कामे करत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कामाची शैली ही लोकांशी जोडलेली आणि समस्यांवर उपाय शोधणारी होती.
जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पोथरे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहून त्यांनी एकहाती विजय मिळवला. हा विजय केवळ निवडणुकीचा नव्हता, तर तो त्यांच्या कार्यावर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा होता. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना सरपंच म्हणून निवडून देत त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली.
सरपंच म्हणून कार्य करताना विष्णू रंदवे यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य दिले. रस्ते, पाणीपुरवठा, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांनी पोथरे गावाला विकासाच्या मार्गावर नेले. त्यांच्या कामामुळे गावात सकारात्मक बदल घडू लागले आणि लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली.
“नेतृत्व हे जन्माने नसते, ते जनतेच्या विश्वासातून घडते” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाचा विकास व्हावा, या व्यापक विचारातून त्यांनी सातत्याने काम केले.
सध्या ते जेष्ठ नागरिक, निराधार व अपंग व्यक्तींना संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ योजना यांच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. हजारो गरजू नागरिकांना मासिक मानधन मिळवून देऊन त्यांनी त्यांच्या जीवनाला आधार दिला आहे. या कार्यामुळे त्यांना जनतेचा अपार आशीर्वाद लाभला आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ते जेष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह, काम करण्याची ऊर्जा आणि लोकांशी असलेला जिव्हाळा हा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
विष्णू रंदवे हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नसून ते एक अष्टपैलू, हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे नेतृत्व आहे. सर्व गटांशी सुसंवाद ठेवत, निरपेक्ष भावनेने लोकसेवा करणारे त्यांचे कार्य आजच्या काळात आदर्शवत आहे.
त्यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी ७ वाजता नागरी सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसामान्यातून उभे राहून लोककल्याणाचे ध्येय जपणाऱ्या विष्णू रंदवे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा!


