महावितरणने तात्काळ आठ तास विजेचा पुरवठा करण्याबाबत आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा इशारा
महावितरणने तात्काळ आठ तास वीजपुरवठा करणेबाबत आदेश द्यावेत, अन्यथा येत्या शुक्रवारी आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले. करमाळा मतदार संघात सध्या शेतीपंपासाठी फक्त दोनच तास वीजपुरवठा केला जात असून शेतकरी हवालदिल झाला आहे.हा प्रश्न परवा जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेतही गाजला. सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम माजी आमदार नारायण पाटील यांनी याविरोधात आवाज उठवला व आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याचे जाणवले आणि मा आ पाटील यांनी आपले नियोजित आंदोलन रद्द केले. परंतू महावितरणने अद्यापही उपविभागीय कार्यालयांना, सबस्टेशनला तसे लेखी आदेश न दिल्याने आज मा आ पाटील यांनी आपण शुक्रवारी दुपारी बारा वाजता कुंभेज फाटा चौकात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर करून आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना मा आ पाटील म्हणाले की करमाळा मतदार संघातील शेतकरी महावितरणच्या कारभारामुळे त्रस्त झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. वीज बील वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्याची मुस्कटदाबी केली जात आहे. संपुर्ण फिडर व डिपी सोडवले जाऊन ज्यांनी वीज बिल भरले आहे त्यांनाही आज याच कृत्रीम वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला न्याय म्हणता येणार नाही. आणि म्हणून मग शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. जर तात्काळ जेऊर, करमाळा, कुर्डुवाडी व टेंभुर्णी या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयांना सोलापुर जिल्हा अधिक्षक, महावितरण यांनी आठ तास वीजेचे आदेश उद्यापर्यंत दिले नाहीत तर आपले आंदोलन नक्की होणार. कायद्याचा सन्मान राखुन कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने हजारो शेतकरी समवेत घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत. शेतकर्यांच्या भावना तीव्र असल्या तरी लोकशाही व सत्याग्रह याचा आदर राखत आम्ही रस्त्यावर उतरु. आज शेतकऱ्याला पोरकेपणाची भावना जाणवत असल्याने करमाळा मतदार संघातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मा आ पाटील यांनी सांगितले तसेच शुक्रवारी होणार्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मा आ नारायण पाटील यांनी केले.
“””””””””””””””””
चौकटीत
विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची भुमिका ही शेतकरी विरोधात असुन मागील काही महिन्यांपुर्वी याच आमदार महोदयांनी करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा दोन तास करावा अशी लेखी मागणी आपल्या पत्राद्वारे महावितरणचे सोलापुर जिल्हा अधिक्षक यांच्या कडे केली होती. आज लेखी पत्र महावितरणला बळ देत असुन शेतकऱ्याला अडचणीत आणत आहे. सन 2014 ते 2019 या माझ्या आमदारकीच्या कालावधीत एकदाही शेतकऱ्याची शेतीपंपाची वीज हि वीज बिल वसुलीपायी तोडली गेली नाही अथवा शेतकऱ्याच्या दारात अधिकारीच काय पण वायरमन सुध्दा गेला नाही.आज मागील सात महिन्यात तीन वेळा वीज कनेक्शन तोडुन कुठे एक तर कुठे दोन तास वीज दिवसातुन एकदा दिली जातेय. मांजरगाव ता करमाळा येथील सबस्टेशन वरुन काही फिडरचा गेल्या दहा दिवसांपासून संपुर्ण वीजपुरवठाच बंद आहे.एक मिनीटही वीज दिली गेली नाही. शेतीपंपाची वीज तर बंदच करत असताना सिंगल फेज वीजपुरवठा सुध्दा बंद केला जातोय. यामुळे मग दुध उत्पादन व्यावसायिक व कुकुटपालन शेतकरीही अडचणीत आलाय. शेतकर्यांना न्याय मिळवून न देणारी आमदारकी मी तरी स्विकारली नसती. आज आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रपंचापेक्षा राज्याच्या आर्थिक तिजोरीची जास्त काळजी करत असून शेतकरी त्यांची हि भुमिका कधिही विसरणार नाहीत असा हल्लाबोलही माजी आमदार नारायण पाटील यांनी केला.
